‘राजेशाहीतून लोकशाहीकडे निघालेल्या उद्धव ठाकरेंचं अभिनंदन!’ ; भाजपचा खोचक टोला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निवासस्थानी आज मविआ मधील तीन पक्षांची बैठक झाली. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली दरम्यान भाजपकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी राजेशाहीतून लोकशाहीच्या मूल्यांकडे होत असलेल्या प्रवासाबद्दल उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन अशा शब्दात खोचक टोला लगवला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “उद्धव ठाकरे जे कधीही बाहेर पडत नव्हते, ते प्रकाश आंबेडकरांना भेटायला जातात, तो प्रस्ताव घेऊन अजित पवारांच्या घरी जातात. राजेशाहीतून लोकशाहीच्या मूल्यांकडे होत असलेल्या या प्रवासाबद्दल त्यांचे अभिनंदन. लोकशाही मूल्ये जपणार्या प्रत्येक घडामोडींचे भाजपाने कायमच स्वागत केले आहे.”
“G20 सारख्या महत्त्वाच्या बैठकीसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रितसर 15 नोव्हेंबर 2022 रोजी निमंत्रण पाठवून, दोनवेळा फोनवर अगत्याने निमंत्रण देऊन सुद्धा त्या बैठकीला न जाता, आजचाच दिवस आपण बैठकीसाठी निवडला, यातून राष्ट्रवैभवाप्रती सुद्धा आपली नियत दिसून आली” असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
पुढे बावनकुळे म्हणाले की, “असो, राष्ट्र प्रथम आणि लोकशाही मूल्य यावर आपल्या आणि सवंगड्यांबाबत न बोललेलेच बरे. तरीसुद्धा मातोश्रीचा उंबरठा ओलांडून आपण बाहेर आलात. अभिनंदन! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नियतीला सुद्धा राजेशाहीचा लोकशाहीकडचाच प्रवास अभिप्रेत आहे” असे बावनकुळे म्हणाले आहेत.
महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीकडून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मविआच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. त्यानुसार १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे. यामध्ये सर्व महाराष्ट्र प्रेमींनी सहभागी व्हावं असं आवाहन मविआच्या नेत्यांकडून करण्यात आलं आहे.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यातील सरकार आता कायदेशीर की बेकायदेशीर याचा निकाल लागायचा आहे. पण हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्राचा सातत्यानं अपमान होतोय. फुटिरतेची बीज इथं रोवली जात आहेत. यामध्ये शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोडण्याचा हेतू पुरस्सर प्रयत्न सुरु आहे. केवळ राज्यपाल आहेत म्हणून त्यांचा सन्मान राखावा लागतोय. राज्यपालांना महाराष्ट्राची अस्मिता, अस्तित्व छन्नविछिन्न करुन टाकायचं आहे.”