यंत्रणेने अलर्ट राहण्याच्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सुचना ; पाण्याची पातळी वाढण्याचा अंदाज घेवून नागरिकांना सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करावे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 18 जुलै :- जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तसेच बेंबळा, अपर वर्धा, लोअर पूस व इतर प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास प्रकल्पामधील पाण्याचा विसर्ग सुरूच राहणार आहे, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने पाण्याची पातळी वाढण्याचा अंदाज घेवून नदीकाठच्या गावातील नागरिकांना रात्री उशीरापर्यंत सुरूक्षीत स्थळी स्थलांतरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
जिल्ह्यातील पूर परिस्थीतीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, सिंचन प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता मनिष राजभोज, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, तहसिलदार व संबंधीत यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी विविध धरणातील पाण्याची पातळी व पावसामुळे जमा होणारे पाणी याबाबत सर्वच तालुक्यातील सद्य परिस्थतीचा आढावा घेतला. पाऊस सुरूच राहील्यास कोणत्या गावात आपत्तीजनक परिस्थिती ओढवू शकते, यापुर्वी पुराच्या पाण्याने आपत्ती ओढवलेली गावे कोणती याबाबत त्यांनी विचारणा करून संभाव्य आपत्ती येणाऱ्या नदीकाठच्या गावातील नागरिकांना वेळीच मदत करण्याचे व यंत्रणेने अलर्ट राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच निष्काळजीपणाने कोणीही पाण्यात जाणार नाही याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले.