हिंगोली , नांदेड मध्ये पूर परिस्थिती ; दिल्लीतून सीएम एकनाथ शिंदेंनी लावला कलेक्टरला फोन……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून एकनाथ शिंदे ‘अॅक्शन मोड’मध्ये आहेत. सतत दौरे आणि शासन निर्णयांचा सपाटा त्यांनी लावला आहे. अशातच, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्व जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे.
हिंगोली जिल्ह्यात शनिवारी ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. नदीला पूर आल्यानं कुरुंदा गाव अख्खं पाण्याखाली गेलं आहे.
याबाबतची माहिती मिळताच, दिल्ली दौऱ्यावर असलेले एकनाथ शिंदे यांनी येथील पूरस्थितीचा आढावा घेतला. प्रवासातच असताना त्यांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला. पुरात अडकलेल्या नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत रेस्क्यू करा, अशा सूचनाच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून आढावा घेतला. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची- राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली. काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे, असेही निर्देश त्यांना दिले.
मेळघाटात दूषित पाण्यामुळं ५० जणांची प्रकृती खालावली, मुख्यमंत्र्यांचा अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनाही फोन….
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने ५० जणांची प्रकृती बिघडली होती. या सगळ्यांना डायरिया झाल्याचे निष्पन्न झाले होते. या नागरिकांपैकी ३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून त्याच्याशी संवाद साधला. या सर्वांवर तातडीने उपचार करावेत तसेच गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असली तरीही, उर्वरित लोकांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून दिली. यावेळी या सर्वांना योग्य उपचार मिळतील, तसेच मृतांचा आकडा वाढू नये यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली.