महाविद्यालये ४ फेब्रुवारी तर शाळा ७ फेब्रुवारी पासून अनलॉक ; दोन डोज घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात उपस्थित राहण्यास परवानगी ; ग्रामीण भागात पहिलीपासूनचे तर शहरी भागात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 01 फेब्रुवारी :- जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये 4 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. तसेच ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी चे वर्ग तसेच शहरी भागातील इयत्ता पाचवी पासूनचे वर्ग दिनांक 7 फेब्रुवारी पासून सुरू करण्याबाबतचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडे दिनांक 31 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे.
इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग यापुर्वीच 27 जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहेत तर शहरी भागातील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत यथावकाश निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच पालकांनी संमती नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग नियमितपणे सुरू ठेवण्याच्या सूचना आहेत.
शासनाच्या 20 जानेवारी 2022 रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांनुसार कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. शाळा दररोज 3 ते 4 तास घेण्याचे, पालकांना लसिकरणासाठी प्रोत्साहीत करण्याचे, जास्त विद्यार्थी असलेल्या शाळेत सकाळ व दुपार च्या पाळीत वर्ग भरविणे, मैदानी खेळ, स्नेहसंमेलन इ. गर्दीचे कार्यक्रमांवर बंदी, सर्दी, ताप, खोकला असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सक्ती न करण्याचे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे तसेच निर्देशीत सूचनांचे शाळेत पालन करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी व क्षेत्रीय पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत नियमित तपासणी करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महाविद्यालये 4 फेब्रुवारी पासुन सुरू होणार :
जिल्ह्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहायित विद्यापीठे, समूह विद्यापीठे, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थामधील नियमित वर्ग दिनांक 04 फेब्रुवारी 2022 पासून विशेष सुचनांचे पालनास प्रत्यक्षरित्या ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांमध्ये ज्यांनी कोविड-19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. अशा विद्यार्थी/ विद्यार्थीनींना महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी राहील. तथापि, लसीकरण (दोन्ही डोस) न झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही, त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
विद्यापीठ /महाविद्यालयांच्या दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत घेण्यात येणा-या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात. तद्नंतर घेण्यात येणा-या परीक्षा ऑफलाईन/ ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. विजेची अनुपलब्धता किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे किंवा विद्यार्थी अथवा त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित असल्यास किंवा आरोग्यविषयक इतर समस्यामुळे विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्याची ऑफलाईन/ ऑनलाईन पध्दतीने पुनर्परीक्षा घेण्यात यावी. परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचीत राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. काही भागात नेटवर्क सेवा विस्कळीत असल्यास किंवा उपलब्ध नसल्यास जिल्हाधिका-यांची परवानगी घेऊन ऑफलाईन स्वरुपात या भागातील विद्यार्थ्याच्या परीक्षा घेण्यात याव्यात.
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्याना येणा-या संभाव्य अडचणी व शंकांचे निरासन करण्यासाठी विद्यापीठे/ महाविद्यालयांनी हेल्पलाईनची व्यवस्था करावी. परीक्षा व्यवस्थितरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच, हेल्पलाईन नंबर, इत्यादी स्वयंस्पष्ट माहिती उपलब्ध करुन द्यावी. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या उपस्थितीबाबत विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा.
ज्या विद्यार्थी/ विद्यार्थीनींनी कोव्हिड ची लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख / महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे. तसेच विद्यापीठ / महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे देखिल लसीकरण प्राधान्याने करुन घ्यावे.
जिल्ह्यातील सुरु होणारी सर्व विद्यापीठे व त्यांच्याशि संलग्नित महाविद्यालयांनी कोव्हिड-19 च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश कामाच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निर्देश राज्यशासनाने वेळोवेळी काढलेली मार्गदर्शक तत्वे किंवा मानक कार्यप्रणाली (एसओपी) तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….