“डुप्लिकेट शिवसेनेचे लोक मला जिवंत गाडणार म्हणत आहेत…” ; नंदुरबारमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी असे का म्हणाले…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नंदुरबार :- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोर लावला आहे. दरम्यान नंदुरबारमधील भाजप उमेदवार हिना गावित यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, डुप्लिकेट शिवसेनेचे लोक मला जिवंत गाडणार असल्याचे म्हणत आहेत.
दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकतेच औरंगजेब आणि पंतप्रधान मोदी यांची तुलना करणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
शिवसेना (UBT) लोकांची दिशाभूल करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंना किती त्रास होत असेल याचा विचार करून मला अनेकदा वाईट वाटते. आता या डुप्लिकेट शिवसेनेच्या लोकांनी बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांनाही आपल्या प्रचारात घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मला जिवंत गाडण्याचे स्वप्न पाहणे ही काही मोठी गोष्ट नाही. या लोकांनी जनतेचा पाठिंबा आणि विश्वास गमावला आहे, त्यांचे राजकीय मैदान निसटले आहे.”
“पण ते हे विसरतात की, भारतातील 140 कोटी लोक माझे रक्षक आहेत. या देशाची ‘मातृशक्ती’ माझी ढाल आहे. माझ्यावर ‘मातृशक्ती’चा इतका आशीर्वाद आहे की हे लोक मला जिवंत गाडू शकणार नाहीत,” पंतप्रधान पुढे म्हणाले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
अहमदनगर येथे एका सभेत बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, तुम्ही इतिहास बघा, नरेंद्र मोदींच्या गावात औरंगजेबचा जन्म झाला. अहमदाबादच्या पुढे दाहोद नावाचे गाव आहे, जिथे औरंगजेबाचा जन्म झाला. औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला, म्हणूनच ते (पीएम मोदी आणि अमित शहा) आपल्याला औरंगजेबासारखे वागवत आहेत. पण या महाराष्ट्राच्या भूमीत आपण एका औरंगजेबाला गाडले आहे हे लक्षात ठेवा. 27 वर्षे औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीवर लढत होता. शेवटी आम्ही त्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडून त्याची कबर खणली.
सध्या देशभरात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. सात टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकीसाठी आतापर्यंत तीन टप्प्यातील जागांवर मतदान झाले आहे. आणखी चार टप्प्यांतील मतदान बाकी आहे.
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून एनडीएला जास्तीत जास्त जागा मिळाव्या यासाठी पंतप्रधानांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे.