इतिहास निवडणूक शाईचा ; कुठे आणि कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. यासाठी देशभरात 7 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. आतापर्यंत मतदानाचे दोन टप्पे पार पडले असून, आज 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे.
543 जागांसाठी होत असलेल्या या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार असून, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅट्ट्रिक साधणार की विरोधक बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, प्रत्येक निवडणुकीवेळी मतदारांच्या बोलाटा मतदान केल्यानंतर लागणारी शाई चर्चेत येत असते. आता आज राज्यातील बहुतांश भागांत मतदान सुरू झाले असताना ही शाई पुन्हा चर्चेत आली आहे.
भारतातील निवडणुकांमध्ये वापरण्यात येणारी निळी शाई भारतातच तयार होते. वास्तविक, म्हैसूर पेंट आणि वार्निश लिमिटेड नावाची कंपनी ही निळी शाई तयार करते. ही शाई निवडणुकीत वापरली जाते.
निळ्या शाईचे उत्पादन करणारी कंपनी याची किरकोळ विक्री करत नाही. उलट ही शाई सरकार किंवा निवडणुकीशी संबंधित एजन्सी खरेदी करते आणि कंपनी त्यांना पुरवठा करते.
वास्तविक, निवडणुकीची शाई बनवण्यासाठी सिल्व्हर नायट्रेट रसायनाचा वापर करण्यात येतो. अशा परिस्थितीत, ती कमीतकमी 72 तासांपर्यंत त्वचेवरुन काढली जाऊ शकत नाही. दुसरीकडे, ही शाई पाण्याच्या संपर्कात येताच तिचा रंग काळा होतो आणि नंतर तो पुसलाही जात नाही.
बोटावर शाई लावल्यानंतर त्यामध्ये असलेले सिल्व्हर नायट्रेट आपल्या शरीरात असलेल्या मिठासोबत एकत्र होऊन सिल्व्हर क्लोराईड तयार होते. त्याच वेळी, जेव्हा सिल्व्हर क्लोराईड पाण्यात विरघळते तेव्हा ते त्वचेला चिकटून राहते. त्यामुळे, ते साबणाने देखील काढले जाऊ शकत नाही.
विशेष म्हणजे 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदा या शाईचा वापर करण्यात आला होता. यानंतर देशात झालेल्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत याचा वापर करण्यात आला आहे.
आता ही शाई पंचायतीसह इतर सर्व निवडणुकांमध्ये वापरली जाते. विशेष बाब म्हणजे ही शाई बनवण्याचे सूत्र नवी दिल्लीच्या सीएसआयआरच्या राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेने शोधून काढले आहे. नंतर, ते मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचा परवाना कर्नाटकातील म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड (MPVL) ला देण्यात आला, जी देशात उत्पादन करणारी एकमेव कंपनी आहे.