अपघातातील एकाच कुटुंबातील तीन जण ठार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :- औरंगाबाद येथे वैद्यकीय उपचार घेऊन परत येत असताना वाहनाला अपघात झाल्याने उमरखेड तालुक्यातील खरुस (बु.) येथील तीन जण जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी (ता.चार) रोजी पहाटे चारच्या सुमारास हिंगोलीजवळील नरसी नामदेव रोडवर, बेल्लारी पाटीजवळ घडली.
या घटनेत एकाची प्रकृती गंभीर असून त्याला नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
एकाच गावातील व एकाच कुटुंबातील तीन जणांवर काळाने आकस्मित घाला घातल्याने खरुस गावावर शोककळा पसरली आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजता त्या तिघांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिरुद्ध ऊर्फ सेतू तानाजी वानखेडे (वय२३), संतोष कैलास वानखेडे (वय२२) व अर्चना बाई सुभाष वानखेडे (वय४०, रा. सर्वजण खरुस, ता. उमरखेड) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नाव आहेत.
औरंगाबाद येथे वैद्यकीय उपचार घेऊन कारने हे सर्वजण परत येत असताना मराठवाड्यातील हिंगोलीजवळ रस्त्यावरील वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने भरधाव वाहनाने झाडाला धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती ती वाहनातील चालक अनिरुद्ध वानखेडे व अर्चना वानखेडे यांचा जागेवरच मृत्यू झाला.
रस्त्यावर असलेल्या ढाबाचालकाने अॅम्बुलन्स बोलावून उर्वरित जखमींना उपचारासाठी नांदेडला पाठवले. यावेळी संतोष वानखेडे यांचा वाटेतच मृत्यू झाला तर सुभाष रामराव वानखेडे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाहनातील वानखेडे यांचे पाहुणे अनंता चव्हाण (रा. गोरलेगाव, ता. हदगाव) हा एकमेव व्यक्ती अपघातातून बचावला. ते कारमधून सुस्थितीत बाहेर निघाले. या अपघाताची माहिती कळतात खरूस गावावर शोककळा पसरली.