राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. राहुल गांधी रायबरेली मतरारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
तर अमेठी मतदारसंघातून काँग्रेस नेते केएल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने शुक्रवारी दोन्ही जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख ३ मे आहे. त्यामुळे काँग्रेस या दोन मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यास वेळ केला हे स्पष्ट आहे. मात्र, आज दोन्ही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आजच उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल. काँग्रेसकडून याची अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे.
रायबरेली आणि अमेठी मतदारसंघ काँग्रेसचे गढ मानले जातात. पण, गेल्या काही वर्षांमध्ये या दोन्ही मतदारसंघातून काँग्रेसची पिछेहाट होताना दिसत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी अमेठीतून पराभव केला होता. राहुल गांधी यांच्यासाठी आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता. २०२४ त्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी अमेठीतून लोकसभेच्या रिंगणात आहेत.
रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी निवडणूक लढवतात. पण, त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत गेल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांना रायबरेलीमधून मैदानात उभे करण्यात आले आहे. रायबरेलीतून भाजपचे दिनेश प्रताप सिंह मैदानात आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये थेट लढत होईल.
प्रियांका गांधी यांना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता होती. त्यांना रायबरेलीतून तिकीट देण्यात येईल अशी चर्चा होती. पण, ती फोल ठरली आहे. त्यामुळे प्रियांका निवडणूक प्रचार करण्यापूर्तेच मर्यादीत राहतील हे स्पष्ट आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाडमधून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.