बालेकिल्लातूनच “धनुष्यबाण” आणि “घड्याळ” हद्दपार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात गेल्या काही वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडींसह शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही काहीशी आगळी वेगळी ठरणार आहे.
या निवडणुकीत पहिल्यांदाच काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर वेगळेच राजकीय समीकरण तयार झाल्याने बालेकिल्लातूनच धनुष्यबाण आणि घड्याळ हद्दपार झाले आहे. विशेष, म्हणजे या ठिकाणी भाजपने उमेदवार देत मित्रपक्षांवर यशस्वीपणे कुरघोडी केली आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा एक गट भाजपसोबत सत्तेत आणि दुसरा गट काँग्रेससोबत विरोधी पक्षात आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या दुसऱ्या गटाला अनुक्रमे तुतारी आणि मशाल चिन्ह मिळाले. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेल्या उद्धव ठाकरेंना पहिल्यांदाच मशाल हे नवीन चिन्ह तर राष्ट्रवादीची स्थापना करणाऱ्या शरद पवार यांना तुतारी या नव्या चिन्हासोबत निवडणुकीला सामोरे जात आहे.
दोन दिवसांपूर्वी नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर चर्चा सुरु झाली ती शिवसेनेच्या धनुष्यबाणाची. कारण पहिल्यांदा तळ कोकणात शिवसैनिक हे धनुष्यबाणावर नाही तर भाजपच्या कमळ चिन्हावर मतदान करणार आहेत. त्यामुळे मागील 20 वर्षांची धनुष्यबाणावर मतदान करण्याची परंपरा खंडीत होणार आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. परंतु महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपकडे तर रायगड लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघात धनुष्यबाण हे चिन्ह मतदान यंत्रावर यंदा पाहायला मिळणार नाही.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा सातारा आणि भंडारा गोंदिया मतदारसंघातून घड्याळ चिन्ह हद्दपार झाले आहे. एकंदरीतच यंदाची निवडणूक ही विविध कारणाने महत्त्वाची ठरणार आहे. ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन महत्त्वाच्या पक्षांना प्रचंड तडजोड करावी लागणारी ठरणार आहे. या तडजोडीच्या राजकारणाचा परिणामी आगामी काळात विधानसभा निवडणुकींवर देखील पाहायला मिळेल.
यंदा पहिल्यांदा घडणाऱ्या घटना :–
1) 20 वर्षानंतर पहिल्यांदा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये धनुष्यबाण मतदान यंत्रावर नसेल.
2) ठाकरे कुटुंबीय पहिल्यांदा धनुष्यबाण चिन्हाव्यतिरिक्त इतर चिन्हावर मतदान करणार.
3) भिवंडीतून पहिल्यांदा काँग्रेसचा हाताचा पंजा हद्दपार होणार.
4) शिवेसना पहिल्यांदा 20 पेक्षा कमी जागांवर लढणार आहे.
5) स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा वर्ध्यातून काँग्रेसचा पंजा गायब.
6) परभणी मतदारसंघात 35 वर्षानंतर धनुष्यबाण चिन्ह गायब.
7) दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम मधून काँग्रेसचे चिन्ह गायब होणार.
8) राज्यातील प्रमुख पक्षांकडून एकही मुस्लीम उमेदवार नाही.
9) 20 वर्षानंतर पहिल्यांदाच अमरावतीत काँग्रेसचा पंजा मतदान यंत्रावर असेल.