3 वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना राजीनामा ; अरुण गोयल यांच्याबाबत जाणून घ्या 5 गोष्टी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अरुण गोयल हे निवडणूक आयोगातील दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी होते.
वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचं गोयल म्हणाले आहेत.
केंद्र सरकारने त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आपला निर्णय बदललेला नाही. निवडणूक आयोगामध्ये तीन पदे महत्त्वाची असतात. यात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. एका निवडणूक आयुक्ताची जागा याआधीच रिक्त होती. आता आणखी एका आयुक्ताने राजीनामा दिला असल्याने केवळ मुख्य निवडणूक आयुक्त राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही मोठी घडामोड आहे.
अरुण गोयल यांच्याबाबत पाच महत्त्वाच्या गोष्टी
१. अरुण गोयल हे १९८५ सालचे पंजाब कॅडरचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत
२.त्यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी १८ नोव्हेंबरला प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी २१ नोव्हेंबरला निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
३. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२५ मध्ये संपणार होता. त्यांच्यानंतर अरुण गोयल यांचाच क्रमांक मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून लागला असता.
४.अरुण गोयल यांना डिसेंबर २०२७ पर्यंत कार्यकाळ मिळाला असता. त्यामुळे तीन वर्ष आधीच गोयल यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
५. निवडणूक आयुक्त अरुण गोयल हे फेब्रुवारीमध्ये निवृत्त झाले होते. त्यांच्यानंतर आता गोयल यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे तीन सदस्यीय निवडणूक समितीमध्ये आता केवळ राजीव कुमार राहिले आहेत.
निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षांचा
मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे तर निवडणूक आयुक्तांचे वय ६२ इतके असते. निवडणूक आयुक्तांचे पद आणि वेतन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसारखे असते.
मुख्य निवडणूक आयुक्तांना संसदेतील महाभियोगाच्या माध्यमातून हटवण्यात येऊ शकतं किंवा त्यांना स्वत: राजीनामा देता येतं. निवडणूक आयोगाकडे विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या निवडणुकांची जबाबदारी असते.