प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर पुन्हा हल्लाबोल ; म्हणाले, “येत्या दोन-तीन दिवसांत.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कोणत्याही क्षणी आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्या अनुषंगाने राज्य तसेच देशातील पक्षांनी तयारीदेखील चालू केलीय. दरम्यान महाराष्ट्रात मात्र सत्तेत असलेल्या महायुती आणि विरोधी बाकांवरील महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावर अंतिम तोडगा निघालेला नाही.
महाविकास आघाडीत अद्याप १५ जागांवरील तिढा सुटलेला नाही. असं असतानाच प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतील घटकपक्षांवर टीका करत आहेत. नुकतेच त्यांनी काँग्रेसमध्ये काही नेते हे सुपारीबाज आहेत, असं विधान केलंय. त्यानंतर आता आंबेडकरांनी नव्याने मी लवकरच या सुपारीबाजांची नावे जाहीर करणार आहे, असं सांगितलंय. त्यामुळे ते आगामी कोणता गौप्यस्फोट करणार? असा प्रश्न विचारला जातोय.
“…हे दोन ते तीन दिवसांत सांगतो”
केल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा भाग असलेल्या वंचित बहुजन आघाडी (वंबुआ) या पक्षाकडून वेगळी भूमिका घेण्यात येत आहे. वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यावर टीका करताना दिसतायत. काँग्रेसमध्ये काही नेते हे सुपारीबाज आहेत, अशी टीका केलीय. त्यानंतर आता वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मी काँग्रेसच्या सुपारीबाज नेत्यांची नावे जाहीर करणार आहे, असं सांगितलंय. “काँग्रेसमधील सुपारीबाज कोण आहेत हे दोन ते तीन दिवसांत सांगतो. मी त्यांची नावं जाहीर करणार आहे. त्यांची नावं घ्यायला आम्ही घाबरत नाही. आम्ही रोखठोक आहोत,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“महाविकास आघाडीत १५ जागांवर वाद”
“महाविकास आघाडीची आज (९ मार्च) बैठक होती. मात्र आजची बैठक ही रद्द झाली. ही बैठक रद्द झाली आहे हे आम्हाला सांगण्याची तसदीही कोणी घेतली नाही. आम्हाला जे समजून घ्यायचं आहे ते आम्ही समजून घेतलं. तुम्ही बैठक बोलावता, आम्ही येतो. तुम्ही बैठक रद्द करता ते तुम्ही आम्हाला सांगत नाहीत. त्यामुळे आमचं स्थान काय आहे, याची आम्हाला कल्पना आली आहे,” असं सूचक विधानही प्रकाश आंबेडकरांनी केलंय. तसंच महाविकास आघाडीत १५ जागांवर वाद आहे. तो तिढा अद्याप सुटलेला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
प्रकाश आंबेडकर याआधी काय म्हणाले होते?
प्रकाश आंबेडकर ८ मार्च रोजी एका सभेला संबोधित करत होते. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रेसमधील एका माजी मुख्यमंत्र्यांना राज्यपालपदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. “तुमचा एक मुख्यमंत्री गेला. दुसरा मुख्यमंत्री राहिलाय. त्यालाही अजेंडा देण्यात आला आहे. काय आहे तो अजेंडा? तर एकीमध्ये बिघाड करणं. एकीमध्ये बिघाड केला तर मे-जूनमध्ये कुठलातरी राज्यपाल म्हणून जाशील. काँग्रेसमध्ये असे अनेक सुपारीबहाद्दर आहेत”, असं प्रकाश आंबेडकर इचलकरंजीच्या सभेत म्हणाले.
“तुम्ही भुरटे चोर आहात”
“काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आमचा सल्ला आहे. आधी हे सुपारीबहाद्दर ओळखून काँग्रेसमधून फेकून द्या. तुमची काँग्रेस वाढायला सुरुवात होईल. या सुपारीबहाद्दरांना आवरलं नाही तर निवडणुकांनंतर तुम्ही जेलमध्ये जाल हे लक्षात ठेवा. काँग्रेसवाल्यांनो, तुम्हाला मी आव्हान करतो. तुम्ही भुरटे चोर आहात. त्या भुरट्या चोरीची कबुली द्या. लोक तुम्हाला माफ करतील”, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.