महाविकास आघाडीत मतभेद मिटण्यावर ‘वंचित’च्या समावेशाचा निर्णय अवलंबून – प्रकाश आंबेडकर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाविकास आघाडीत १५ जागांवर मतभेद आहेत. ते मिटल्यावरच वंचित बहुजन आघाडी आघाडीत असणार की नाही ते ठरेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सांगितले.
राजकीय न्याय हक्क निर्धार सभेच्या निमित्ताने डॉ. आंबेडकर आज इचलकरंजीत आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वाट्याला किती जागा मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय. पण १५ जागांबाबत महाविकास आघाडीत मतभेद असल्याने आम्हाला या भिजत घोंगड्याच्या निर्णयाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात असले की धर्म, जातीचे राजकारण यशस्वी होते. त्यामुळे एकास एक उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत आमच्या बाजूने निर्णय न झाल्यास सर्व ४८ जागा स्वतंत्र लढण्याची तयारी आहे. या निवडणुकीत एमआयएमबरोबर वंचित आघाडी जाणार नाही आणि या निवडणुकीत वंचित-भाजप अशीच खरी लढत होईल, असे त्यांनी सांगितले.
इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले जात असले तरी इथेनॉल उत्पन्नाचा ऊसाच्या दरात समावेश केला तर किमान १०० रुपये वाढ होऊ शकते. शेतकरी नेते आणि सरकारही याबाबत बोलत नसल्याने लोकसभा निवडणुकीत इथेनॉल उत्पन्नाचा ऊस दरात समावेश करण्याची मागणी अजेंड्यावर असल्याचेही त्यांनी सांगितले.