असा असेल लोकसभेचा जागा वाटपासाठीचा नवा फॉर्म्युला..? दिल्लीतील बैठकीत काय ठरलं..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. सर्वच पक्षानं लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रचारानं वेग घेतला आहे.
मात्र, महाराष्ट्रात अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून जागा वाटपाच्या नव्या फॉर्म्यूल्यावर या बैठकीत चर्चा झाली असल्याचं समोर आलं आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याचा सल्ला अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे. जो विजयी होईल त्यांनाच तिकीट द्या, अशा सूचना गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेला दिल्या आहेत. शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याची सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . काही उमेदवारांबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना साशंकता असल्याचं सांगितलं जात आहे.
दुसरीकडे जागावाटपाबाबत अजित पवार मात्र जागा वाढवून मागण्यावर ठाम होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 3 ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार मात्र अजून काही जागा वाढवून घेण्यावर ठाम होते. मात्र, बैठकीत याबाबत काय निर्णय झाला, हे अद्याप समोर आलेलं नाही. तर, शिवसेना 10 ते 12 जागा लढण्याची शक्यता आहे. यातीलही काही जागांवर शिवसेनेने उमेदवार बदलावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी सुरू असलेली महायुतीची बैठक जवळपास अडीच तासानंतर संपली. बैठकीत महायुतीचा फार्मूला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, महायुतीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार न बोलता निघाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकाच विमानाने मुंबईसाठी रवाना झाले. तर, देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे एकाच फ्लाईटने नागपूरला रवाना झाले.