म्हणून महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी भाजपने लांबवली, काँग्रेस चे माजी मंत्र्यांचा पत्रकार परिषदेत आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मोदीनंतर पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. त्यामुळे त्यांचे नाव घ्यायचे नसल्याने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी भाजपकडून लांबविण्यात आली, अशी टीका अखिल भारतीय आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
शिवाजीराव मोघे म्हणाले, देशात २०१४ सालापासून आलेले मोदी सरकार हे शेतकरीविरोधी आहे. २०१४ मध्ये मोदींनी यवतमाळात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ आश्वासने दिली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांची एकही आत्महत्या होऊ देणार नाही असे म्हटले. मात्र, १० वर्षांमध्ये २ हजार ७१९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातीलही केवळ १ हजार २९५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविली. २८ फेब्रुवारीला त्याबाबत ‘ब्र’ही त्यांनी उच्चारला नाही.
काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांवर अन्याय केला. पंजाब, हरयाणासह देशभरातील शेतकऱ्यांच्या आंदोलकांपुढे ते कायदे मागे घेतले. मात्र, अद्यापही त्यांचे धोरण हे व्यापारधार्जिने असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे, कापूस जिथे पिकतो, तिथे गोदाम, उद्योग देण्याचे आश्वासन फोल ठरले असून एकही उद्योग येथे आला नाही.
सोयाबीन, तूरडाळ यावर निर्यात बंदी लादली. भारतातील नदीजोड प्रकल्पाचाही त्यांना विसर पडला. उलट विकासापेक्षा जाती, धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे काम केले. देशात हुकूमशाही आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे नेते गिरीश पांडव उपस्थित होते.
यवतमाळ मतदारसंघ आमचाच
यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून १९५२ पासून कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला. मात्र, काही वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार तिथे निवडून येतोय. त्यामुळे त्यांनीही दावा केला आहे. इंडिया आघाडीमध्ये जो निर्णय होईल त्यानुसार आम्ही काम करू. मी उमेदवार असेल वा नसेल याबाबत पक्ष जे म्हणेल ते मान्य राहील असेही शिवाजीराव मोघे म्हणाले.
चव्हाण ईडी, सीबीआयच्या भीतीने भाजपात
देशातील ज्या राज्यात कॉंग्रेसचे सरकार आले, त्या राज्यातील आमदार पळविण्याचे काम मोदींनी केले. त्यासाठी ईडी, सीबीआय मागे लावण्यात येते. राज्यातही काही नेते भाजपामध्ये गेले. त्यांच्या कपाळावरही ईडी आणि सीबीआयची बंदूक ठेवून प्रवेश देण्यात आला.
दोनदा मुख्यमंत्रीपद भूषविणारे अशोक चव्हाण यांच्या जाण्याचेही हेच कारण असल्याचे शिवाजीराव मोघे म्हणाले. त्यांना पक्षाने वेळोवेळी सन्मान दिला. प्रत्येक निर्णयात ते सहभागी होते. तिकडे गेल्यावर असचं बोलले जात असल्याचे ते म्हणाले.