महाराष्ट्रातील अनेक भागांत ‘अवकाळी’, अचानक गारठ्यात वाढ…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात हिवाळा सुरू असून गारठा वाढला आहे. मात्र एकिकडे गारठ्यात वाढ झाली असली तरी, दुसरीकडे अवकाळी पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक भागात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
वादळी वारा व विजांच्या गडगडाटासह पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामना विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. परिणामी, अवकाळी पावसामुळे हवेत गारठा वाढला असून, डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. तसेच, पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत अमरावती, नागपूर, अकोला, बुलढाणा, परभणी, बीड, हिंगोलीसह पुण्यात पावसाची हजेरी यला मिळणार आहे. अवकाळी पावसामुळे थंडीत वाढ झाली असून, काही भागात धुक्याची चादर परसल्याचे चित्र यला मिळत आहे. शिवाय, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. तसेच, काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांनाही मोठ्या फटका बसला आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसासह गारपिटीने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यातील विविध भागात पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांसह फळबागांचे मोठं नुकसान झाले आहे. गहू, बाजरी, लिंबू आणइ टरबूज पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्रासह देशातील इतर भागांतही अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार, अरुणाचल प्रदेशात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार ते अतिवृष्टी किंवा हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातही पावसासोबत बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये पावसासोबत सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.