राज ठाकरेंचा ईव्हीएमला विरोध ; फडणवीस म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी लोकसभा आणि विधानसभेच्यादृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मतदारसंघाची चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे आज (ता. 24 फेब्रुवारी) राज ठाकरे यांनी कल्याण, डोंबिवलीमधील मध्ये दौरा करत याबाबतची चाचपणी केली.
ज्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. याचवेळी त्यांनी ईव्हीएमबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यांनी प्रसार माध्यमांसमोर ईव्हीएमला विरोध केला. पण त्यांच्या या विरोधाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
देशात ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरू आहे, असा प्रश्न पत्रकारांनी राज ठाकरे यांना विचारला. यावेळी ते म्हणाले की, मी आधी बोलतो, मग पटत तुम्हाला. मराठा आरक्षणाबद्दल मी हेच बोललेलो. काय झाले शेवटी?. माझ्या गोष्टी कालांतराने पटतात. मी आधी जे काही सांगतो, ते कोणालाच पटत नाही. तुम्ही माझ्या केसांवर जाऊ नका. जगभरात बॅलेट पेपरवर होत असेल, तर आपण व्होटिंग मशीन का घेऊन बसलो आहोत? मी मतदान केल्यानंतर ते त्याच उमेदवाराला मिळाले आहे का? हे समजत नाही” असे म्हणत राज ठाकरे यांनी व्होटिंग मशीनला विरोध दर्शवला.
तर, राज ठाकरे यांच्या या विरोधावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावला आहे. राज ठाकरे यांना याआधी ईव्हीएम पटलेले होते. मग आता त्यांना ते पटलेले नाही का? नसेल तर थांबा. काही दिवसांनी पुन्हा त्यांना ईव्हीएम पटू लागेल, असा टोला फडणवीसांनी राज ठाकरे यांच्या विरोधाला लगावला आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेवरही भाष्य केले आहे. कल्याणमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेला राजकीय झालर आहे. मला असे वाटते की आमदार गणपत गायकवाडांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याच्या खोलात जायला हवे. एखादा माणूस इतक्या टोकाला का जाईल? एखादा माणूस पोलीस ठाण्यात घुसून गोळीबार का करेल? हे देखील तपासले पाहिजे. कोणतीही व्यक्ती इथपर्यंतचा निर्णय का घेत असेल? पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार करण्यापर्यंत टोकाचे पाऊल त्यांनी का उचलले असेल? त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल? इतक्या टोकाचे पाऊल उचलण्याची परिस्थिती का उद्भवली असेल. हे प्रकरण इथपर्यंत कोणी आणले? याबाबतची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.