राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, उद्धव ठाकरेंची पहिली मोठी मागणी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोळीबार, हल्ला प्रकरणावरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना आता शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
हे राज्य सरकार तात्काळ बरखास्त करावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
दोन दिवसांपूर्वी दहिसरमध्ये कथित समाजसेवक असलेल्या मॉरिसभाईने शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. ही हत्या फेसबुक लाईव्ह करून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याशिवाय, काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. त्यानंतर विरोधकांकडून आता राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावर सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, अभिषेकला गोळ्या झाडल्या पण कोणी झाडल्या हे कळत नाहीये. बॉडीगार्ड मॉरीसने ठेवला होता, का ठेवला होता? या दोघांना मारण्याची कोणी सुपारी दिली होती का? असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला. काल पुण्यात निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. तो हल्ला भाजपच्या लोकांनी केला. फडणवीस यांना कलंक फडतूस शब्द वापरले होते. पण आता गृहमंत्री मनोरुग्ण म्हणून लाभला आहे का? असा बोचरा सवालही ठाकरे यांनी केला. राज्य सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी आम्ही जनता न्यायालयात करत आहोत असे उद्धव यांनी म्हटले. आम्ही राज्यपालाकडे जाणार नाही, त्या पदाचा काही अर्थ राहिला नसल्याची टीका उद्धव यांनी केली. माझी तळमळ सर्वोच्च न्यायालय समजून घेऊन लवकर निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयाकडून आशा असल्याचे त्यांनी म्हटले.
फडणवीसांवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. फडणवीस असे बोलले कि, श्वान गाडी खाला आला तर राजीनामा देऊ का म्हणाले. कुत्रा काय सगळ्या प्राण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही दिल्लीश्वेर समोर तुम्ही कुत्र्यासारखी शेपटी हलवतात अशी बोचरी टीका ठाकरे यांनी केली.