”बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या” राज ठाकरेंसह राऊतांची मागणी ; म्हणाले, हेच औदार्य…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. शुक्रवारी पंतप्रधानांनी आणखी तीन दिग्गजांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे.
त्यानंतर राज यांनी सोशल मीडियात पोस्ट करुन ही मागणी केली.
राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट
माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो.
राज ठाकरे पुढे म्हणतात, बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी बाळासाहेबांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं.
देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.
अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार स्व. बाळासाहेबांना भारतरत्न देणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी माजी पंतप्रधान नरसिंह राव, चरणसिंह चौधरी आणि कृषीतज्ज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर केल्याचं ट्वीट करत सांगितलं. नुकतंच लालकृष्ण अडवाणी आणि कर्पुरी ठाकूर यांनाही भारतरत्न जाहीर झाला आहे.
दहा वर्षांत दहा जणांना भारतरत्न
१. माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव- २०२४
२. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह- २०२४
३. एमएस स्वामीनाथन- २०२४
४. लालकृष्ण आडवाणी- २०२४
५. कर्पूरी ठाकूर- २०२४
६. नानाजी देशमुख- २०१९
७. भूपेंद्र कुमार हजारिका- २०१९
८. प्रणव मुखर्जी- २०१९
९. पंडित मदन मोहन मालवीय- २०१५
१०. अटल बिहारी वाजपेयी- २०१५
संजय राऊत यांचीही पोस्ट
हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण झाले…आधी 2 आणि आता एकदम 3 असे एका महिन्यात 5 नेत्यांना भारतरत्न ने सन्मानित करण्यात आले…पण त्यात ना वीर सावरकर ना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे!
खरं तर नियम असा आहे की एका वर्षात जास्तीत जास्त 3 भारतरत्न देता येतात. मोदी यांनी एका महिन्यात 5 जणांना भारतरत्न जाहीर केले… निवडणुकांची धामधूम. दुसरे काय? कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवानी यांच्या मागोमाग आता चौधरी चरण सिंग. पीव्ही नरसिंहराव आणि एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्नने सन्मानित केले.. आणखी काही नेते प्रतीक्षेत आहेत. पण मा. बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का? ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला.. ज्यांच्यामुळे मोदी अयोध्येत राममंदिर सोहोळा करू शकले.. त्यांना भारतरत्न देण्याची मागणी राऊतांनी केली.