हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू, दंगलखोरांना दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हल्द्वानी :- उत्तराखंडच्या हल्द्वानी जिल्ह्यात वनभूलपुरा इथं अवैध अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि अधिकाऱ्यांवर दगडफेक आणि हल्ला झाला. या हल्ल्यात ६ लोकांचा मृत्यू झाला आहे.
तर २५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. गेल्या गुरुवारी मदरसा आणि धार्मिक स्थळ पाडताना तणाव निर्माण झाला होता. तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. हिंसाचार झालेल्या भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. सर्व शाळा बंद ठेवण्यात आले असून हल्द्वानी शहराचं छावणीत रुपांतर झालंय.
जखमींमध्ये पोलीस, सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलीसांच्या टीमसोबत सरकारी जमिनीवर बांधण्यात आलेल्या मदरसा आणि मशिदीचे अतिक्रमण हटवण्यावरून वाद सुरू झाला होता. मलिक का बगीचा परिसरात अवैध मदरसा आणि मशिद बांधण्यात आली होती. जिल्ह्यात पोलीस, पीएसी आणि अर्धसैनिक बल तैनात आहे. गुरुवारी रात्री प्रशासनाने दंगलखोरांची ओळख पटवण्याचे काम हाती घेतले आहे.
हिंसाचारानंतर मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी हल्द्वानीतील वनभूलपुरामध्ये अवैध बांधकाम हटवताना झालेल्या घटनेला गांभीर्याने घेतलं आहे. अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तर घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वनभूलपुरात कर्फ्यू लागू केला आहे आणि दंगलखोरांना दिसताच गोळ्या घाला असे आदेशही दिले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बनभूलपुरा इंदिरा नगर क्षेत्रात मलिक के बगीचा इथं बांधण्यात आलेल्या मदरसा आणि मशिदीचं अतिक्रमण जेसीबी मशिनने काढण्यात आळं. यावेळी घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी होते. कारवाई सुरु होताच मोठ्या संख्येने महिलांसह स्थानिकांनी विरोध केला. यासाठी रस्त्यावर मोठ्या संख्येने नागरिक उतरले होते. त्यांनी बॅरिकेड तोडून कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली.