खोके सरकारमधील बेबनाव चव्हाट्यावर आला, काँग्रेसची टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कुणबी जात प्रमाणपत्र सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा अध्यादेशही सरकारने जारी केला आहे. पण ओबीसी नेते तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
मराठ्यांना आरक्षण मिळाल्याचा आनंद आहे, तर आम्ही ते गमावले, अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. यावरून महाराष्ट्र काँग्रेसने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासमवेत लाखो मराठा बांधव मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत, तातडीने एक बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर सरकारचे शिष्टमंडळ मनोज पाटील यांच्या भेटीसाठी मध्यरात्रीच्या सुमारास नवी मुंबईत दाखल झाले. सरकारकडून कुणबी जात प्रमाणपत्र सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र देण्याची मनोज जरांगे यांनी केलेली मागणी मान्य केल्याचा अध्यादेश सरकारने जारी केला.
सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजात उत्साहाचे वातावरण आहे. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केला आहे. तसेच, 54 लाख मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या असून त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करावे. तसेच, ज्यांच्या नोदी सापडल्या आहेत, त्यांच्या परिवारातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी विनंती जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना केली.
तर दुसरीकडे, ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायचे आहे तर, त्याला आमचा पाठिंबा आहे. परंतु, तुम्ही सरसकट मराठा समाजाला ओबीसीत ढकलत आहात, यावर आमचा आक्षेप असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. सर्वेक्षण करून पुन्हा मराठा आरक्षण द्यायचा प्रयत्न आहे. क्युरेटिव्ह पिटीशन दाखल होण्यासाठी आमचा पाठिंबा आहे, पण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायची गरज काय? असा सवालही त्यांनी केला आहे.
यावरून महाराष्ट्र काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे. एकीकडे मुख्यमंत्री मराठा समाजाचे अभिनंदन करत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ आपल्याच सरकारला डागण्या देत आहेत. खोके सरकारमधील बेबनाव चव्हाट्यावर आला असून मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये भांडणं लावणाऱ्या खोके सरकारला सत्तेवर रहायचा नैतिक अधिकार उरला आहे का, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.