मनोज जरांगे यांच्या दबाव तंत्राला उत्तर देण्यासाठी ओबीसी समाजही मुंबईत धडकणार :- बबनराव तायवाडे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनोज जरांगे यांच्या दबाव तंत्राला उत्तर म्हणून, आता ओबीसी समाजाने देखील मुंबईकडे कूच करण्याची पूर्व तयारी सुरु केली आहे. मेळावे, सभा जनजागृती या माध्यमातून ओबीसी समाजाला जागृत करायचं काम सुरु झाल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
जरांगे यांनी सरकारवर दबाव तयार करण्यापेक्षा, सरकार काय करू शकते व काय करू शकत नाही यांचा विचार करून सरकारला वेळ द्यायला पाहिजे. त्यानुसार आपली भूमिका ठरवायला पाहिजे असा सल्ला बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्याकडून मुंबईत आमरण उपोषण केले जाणार आहे. यासाठी लाखो मराठा आंदोलकांना घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत आणि जरांगे यांची मागणी मान्य करू नयेत यासाठी ओबीसी समाज देखील आक्रमक झाले आहेत. एवढंच नाही तर ओबीसी समाज देखील आता आपल्या मागण्यांसाठी मुंबईकडे कूच करणार असल्याचा थेट इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्या दबाव तंत्राला उत्तर म्हणून मुंबई आंदोलन करणार असल्याचे देखील तायवाडे म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
ओबीसी समाज 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार
बबनराव तायवाडे यांच्याप्रमाणे बीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सुद्धा मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनावरून सरकारवर निशाणा साधला आहे. “राज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेला जीआर हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा असून, याच जीआराच्या आधारे 54 लाख कुणबी नोंदी आढळल्या असल्याचे शेंडगे म्हणाले आहेत. तर, एवढी लोकं ओबीसीमध्ये येत असतील, तर हा ओबीसीवर अन्याय होत असल्याचं सांगत हा जीआर रद्द करावा अशी मागणी शेंडगे यांनी केली आहे. सोबतच, नव्याने देण्यात आलेल्या कुणबी नोंदी रद्द करावे, या मागणीसाठी राज्यभरातील ओबीसी समाज 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.