मोदी दर सहा दिवसाला इकडे, पण हा महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार :- उद्धव ठाकरे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाशिक येथील मेळाव्यातून पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “आता पंतप्रधांनांच्या वाऱ्या महाराष्ट्रात वाढल्या आहेत.
हा महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार आहे. मोदी दर सहा दिवसाआड महाराष्ट्रात येत आहे. महाराष्ट्र जेव्हा संकटात होता, अवकाळीचा फटका बसला होता, तेव्हा आले नाहीत. विशेष म्हणजे मणिपूरला गेले नाहीत. निवडणूक आल्या म्हणून मोदींना महाराष्ट्र आठवत आहे. देश के लिए मन की बात, गुजरात के लिए धन की बात. रामाच्या, हनुमानाच्या नावावर मत मागणार का? राम भरोसे नाही आता काम भरोसे मतं मिळणार. मोदींच्या नावावर मत मिळणार नाही हे भाजपला समजलं आहे. शेतकरी उपाशी असताना पंतप्रधान उपसा करत आहेत,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.
राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझ्यासमोर प्रत्यक्ष काळाराम बसला आहे. राममंदिराला विरोध नाही. राम मंदिरात शिवसेनेचे योगदान काय हे सांगायची गरज नाही. कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. शिवसेनाप्रमुख यांनी पुढाकार घेतला. राम मंदिर बनविण्यासाठी भाजपला आम्ही पाठिंबा दिला होता. जेव्हा कठीण काळ होता, तेव्हा आम्हीच तुम्हाला साथ दिली, आता शिवसेना संपवायला निघाला. स्वत: संरक्षण कवचात राहतात, आमचे संरक्षण काढू घेता. १९९२-९२ मध्ये शिवसैनिकांनी सर्वधर्मियांना वाचविले”
“घराणेशाहीचा आरोप चुकीचा”
घराणेशाहीच्या आरोपाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्यावर घराणेशाहीचा आरोप चुकीचा. आपण समोर बसलेले तुम्हीच माझे घराणे. पंतप्रधान हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. देशात व गुजरातमध्ये फरक करत आहात. महाराष्ट्र ओरबाडत आहात, ते तुम्हाला ओरबाडू देणार नाही, त्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत. मिंधे खुर्चीसाठी दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत, हे हिंदुत्व बाळासाहेबांनी शिकवलेलं नाही. क्रिकेटची फायनलची मॅचही गुजरातकडे गेली. फिल्मफेअरचा सोहळाही गुजरातमध्ये घेऊन जात आहे. महाराष्ट्राच्या मुळावर घाव का घालता?” असा खरपूस सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
दरम्यान, “२०१४ मध्ये भाजपने युती तोडली, १५ दिवसात ६३ आमदार निवडून दिले. २०१४ साली दिल्लीत उद्धव ठाकरे एकटे काही करणार नाही असा विचार सुरू होता. त्यामुळे आम्हाला संपवण्याचा डाव होता. अमित शहा यांनी वचन मोडलं. फडणवीस पूर्ण मुख्यमंत्री झाले असते. पाव मुख्यमंत्री झाले नसते. महाराष्ट्रात वारंवार यायची गरज नसती पडली. पक्ष चोरता तुम्ही. अजूनही काश्मीरमध्ये हत्या सुरूच आहे. पंतप्रधानांबरोबर चांगले संबध होते, निवडणूक होत असते, जनतेचा निर्णय मान्य करावा लागतो. आम्हाला संपवायची भाषा करता, मी आणि मीच ही भाषा सोडा,” असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.