तर सरकारला महागात पडेल; जरांगेंनी दिला इशारा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा आरक्षणावर तोडगा काढताना सरकार यात वेळकाढूपणा करत आहे. हा मुद्दा त्यांना चिल्लर वाटतो आहे. सरकारला हा धंदा महागात पडेल,” असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
त्यांची पदयात्रा नगर शहरातील जिल्हा परिषदेसमोरील छत्रपती शिवाजीमहाराज आणि श्रीराममूर्तीला अभिवादन करून पुढे निघाली.
मनोज जरांगे म्हणाले, “सरकारने चर्चाबंदीची भाषा सुरू केली आहे. दार बंद केले आहे. वेळ द्या. देऊ, असे धोरण सरकारने स्वीकारले आहे. आमच्याकडून सरकारला चर्चेसाठी दरवाजे उघडे आहेत, याची जाणीव सरकारने ठेवावी. आता तरी आंदोलन सहज घेऊ नका. आंदोलनात सहभागी झालेली वाहने आणि पायी येणारा मराठा याची सरकारने दखल घ्यावी.
25 तारखेला राज्यातील सर्व मराठा मुंबईच्या आझाद मैदानाकडे निघणार आहेत. हे सरकारच्या लक्षात येत नाही. आता व्हाट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून कागदपत्रे पाठवत आहे. हा चिल्लर मुद्दा आहे का ? माता – माऊल्यादेखील रोडवर आहेत, याची जाणीव, गांभीर्य सरकारला नाही. सत्तेची रग अंगात घेऊन आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करू नये. हा प्रयोग झाल्यास हे आंदोलन राज्यासह देशात सुरू होईल.”
“मुंबईत मराठा घुसला आणि तिथे त्रास द्यायचा प्रयत्न केल्यास तिथे गल्ली – गल्लीत मराठा दिसेल. सरकारने जनतेचे पालकत्व घेतले आहे. जनतेला दैवत मानता तुम्ही जनतेला तुम्ही वेठीस धरत आहे, हे सरकारला शोभते का ? आंदोलनाची दखल घेण्याचे आवाहन सरकारला केले आहे. परंतु त्यांनीच चर्चा बंद केली आहे. दारे बंद केली आहेत.
मग म्हटलं, बंद तर बंद. मग होऊ दे खेळ…!
आमच्याकडून दार बंद पाहिजे, तर त्यांच्याकडून बंद होतंय. वा रे धंदा…! आम्ही बघतो दार कसे बंद असते…! तिथे आल्यावर कसे उघडत नाही, ते पण पाहू. पाच दिवस झाली चर्चा नाही. पण मी आता हटत नसतो. सत्तेच्या जिवावर सरकार मराठ्यांना वेठीस धरत आहे,” असा आरोप जरांगे यांनी यावेळी केला.
…तर सरकारची मोठी नाचक्की होईल…
मुंबईत आंदोलनाला अजून परवागनी आहे का ? यावर जरांगे म्हणाले, “लोकशाही आणि कायद्याला धरून अर्ज केला आहे. आमरण उपोषणाला परवानगी देणार नाही, ही सगळ्यात मोठी नाचक्की सरकारची असणार आहे. परवानगी मिळो अगर न मिळो मी जाऊन बसणार आहे. अर्ज देऊन आम्ही सरकारचा सन्मान केला आहे. सरकार पायदळी कायदा तुडवणार असले, तर सरकारची मोठी नाचक्की ठरेल.”
छत्रपतींनंतर पहिल्यांदाच मदरशावर भगवे झेंडे लागल्याचा अभिमान
मदरशातील मुक्कामावर जरांगे म्हणाले, हिंदू – मुस्लिम एकोपा होणे आवश्यक आहे. लोकशाही, संविधानाचे राज्य आहे. धर्माचा स्वाभिमान आहे. त्यांना मुस्लिम, तर मला माझ्या हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे. धर्म विषय वेगळा आहे. दोघांमध्ये माणुसकी जिवंत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे. ही समुदायाची मागणी आहे.
याला साद देण्यासाठी मुस्लिम समाजाने साथ दिली. गैर काहीच नाही. धर्माचा स्वाभिमान असलाच आहे. मुस्लिम समाजाने वेगळा आदर्श उभा केला आहे. पहिल्यांदाच मदरशावर भगवे झेंडे लागले आहेत. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या काळात असे झाले होते. मुस्लिम माता माऊलींना छत्रपतींच्या काळात कसलेच भय नव्हते. संरक्षण होईल, असेच वातावरण होते.
आता मदरशावर भगवा झेंडा तिथे मनोज जरांगे हे समीकरण काय. एकीचे रुप पुन्हा एकदा या मैदानावर दिसेल. मदरशामधील शिक्षणासाठी मुस्लिमांबरोबर हिंदू धर्मातील मुलांना प्रवेश दिला जात आहे. मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न मिटू द्या. मग मुस्लिम आरक्षण कसे मिळत नाही, तेच बघतो. धनगरबांधवांना कसे आरक्षण मिळत नाही तेपण बघतोच, असेही जरांगे म्हणाले.