काँग्रेस नेतृत्वहीन असल्याची आठवलेंची टीका…! प्रकाश आंबेडकरांना केलं ‘हे’ आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देशातील प्रत्येक गरिबाला न्याय मिळाला हवा, भूमिहीनांना जमिनी मिळाव्यात ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाची भूमिका आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला आहे.
या पक्षाचे नावही ज्यांना चालत नाही त्या प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच्या घरात आधी ऐक्य घडून आणावे. आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार आहोत, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
अकोला येथे गायरान जमीन हक्क परिषदेच्या निमित्ताने आले असता शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील आंबेडकरी जनतेने एका मंचावर यावे, ही माझी पूर्वीपासूनची मागणी असल्याचे श्री आठवले म्हणाले. हे ऐक्य प्रकाश आंबेडकर घडवून आणू शकतात. त्याचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे.
तीन भावांचे तीन पक्ष असलेल्या घरातून त्यांनी या ऐक्याची सुरवात करावी, आम्ही त्यांच्यासोबत काम करायला तयार आहोत, असे आठवले म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांना बाबासाहेबांचा नातू म्हणून राज्यात आंबेडकरी जनतेत प्रतिष्ठा, मान आहे. आम्हाला राज्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात बाबासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून मान आहे. आमच्या पक्षाचे नागालँडमध्ये दोन सदस्य निवडून आलेत. देशाच्या कानाकोपऱ्यातही माझा पक्ष असल्याचे ते म्हणाले.
भूमिहीनांना पाच एकर जमीन द्या
राज्यातील भूमिहीनांना पाच एकरापर्यंत गायरान जमिनी देण्यात याव्यात. त्यासाठी समिती गठित करावी, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार असल्याचे श्री आठवले म्हणाले. शहराकडे स्थलांतरित होणारे लोंढे थांबले पाहिजेत, झोपडपट्टी वाढणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी भूमिहीनांना जमिनी देण्याची गरज आहे. बरीच जमीन पडीक, झुडपी आहे, ती भूमिहीनांना देण्यासाठी प्रयत्न करू, असे श्री आठवले म्हणाले.
लोकसभेच्या दोन जागांवर दावा
महायुतीचे राज्यात मेळावे सुरू आहेत. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार आहे. राज्यातील दोन जागा आरपीआयला मिळाव्यात यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
काँग्रेसचा डोळा दलितांच्या मतांवर
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस हा नेतृत्व नसलेला पक्ष असल्याचे टीका केली. आजपर्यंत काँग्रेसने फक्त दलितांची मते वापरली असून, त्यांचा डोळा या मतांवर असल्याचे श्री आठवले म्हणाले.
तामिळनाडूप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्यावे
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध होत आहे. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. ओबीसीप्रमाणे ज्यांचे उत्पन्न आठ लाखांच्या खाली आहे, अशा मराठा समाजातील नागरिकांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी तमिळनाडू पॅटर्न प्रमाण आरक्षण द्यावे. कोटा वाढविल्याने ओबीसीवर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण दिल्या जाऊ शकेल, असे आठवले म्हणाले.