राजकीय भूकंप होणार, पंतप्रधान मोदींसमोर मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. नुकताच शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला. परिणामी शिंदे गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे.
याचिच प्रचिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यात आज पाहायला मिळाला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भूकंप येणार असून आमचे विरोधक ते सहन करणार नाही, असं भाकित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अटल सागरी सेतूचं लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत भूकंप येणार : मुख्यमंत्री
देशातील लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भूकंप येणार आहे. आमचे विरोधक ते सहन करणार नाही. हे सत्य आहे. शिवडी नाव्हा शेवा हा पूल नसून विकासाचा मार्ग आहे. विकासच्या कामाबद्दल विरोधकांच्या पोटात नेहमी दुखतं, त्यांना हे सहन होत नाही. अहंकारी लोकांचा अहंकार संपणार आहे. आमची जबाबदारी वाढली आहे. आता महाराष्ट्रात 45 पार असा संकल्प घेऊन आम्ही पुढे जात आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
शिंदे पुढे म्हणाले, अटल सेतू प्रकल्प हा गेम चेंजर प्रकल्प आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये जे आधीच्या सरकारने केलं नाही, ते 9 वर्षांमध्ये मोदींनी करून दाखवलं आहे. जगभरात पंतप्रधान मोदींचं कौतुक होत आहे. जगभरात भारताचं नाव मोठं झालं आहे. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रासाठी त्यांचं असंच प्रेम राहो.
काय आहे अटल सेतू प्रकल्प?
अटल सेतू सुमारे 21.8 किमी लांब आणि 6 पदरी आहे, ज्यापैकी 16.5 किमी समुद्रावर बांधला गेला आहे तर सुमारे 5.5 किमी जमिनीवर बांधला आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे, जो देशातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे. या पुलामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामधील प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्याच्या दोन तासांवरून 15-20 मिनिटांपर्यंत कमी होईल. या पुलावरून जाणाऱ्या लोकांच्या प्रत्येक प्रवासात किमान 500 रुपयांच्या इंधनाची बचत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासह मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी चांगली होणार आहे.