अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार..? शपथविधीला आठवडा उलटला तरी राष्ट्रवादीचे मंत्री खात्याशिवाय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अजित पवार यांच्या शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झालं.
पण त्यानंतर दुसरा अंक रंगला तो, मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आणि त्यावरुन नाराजीनाट्याचा. पण यावरही मार्ग काढत आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं घेतला आहे. अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस आहे. पुढील 48 तासांत नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीला आठवडा उलटला असला तरीदेखील राष्ट्रवादीचे मंत्री अद्याप खात्याशिवायच आहेत.
साधारणतः आठवडाभरापूर्वी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर 8 आमदारांनीही शरद पवारांची साथ सोडत मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अजुनही त्यांचं खातेवाटप झालेलं नाही. तसेच, शिंदे गटातील इतर काही आमदारही अद्याप मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. अजित पवारांच्या शपथविधीपूर्वी शिंदे गटातील अनेक आमदारांनी मंत्रीपदाचे दावे केले होते. अशातच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या एक ते दोन दिवसांत आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. त्यानंतरच राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या मंत्र्यांचं खातेवाटप केलं जाईल.
अधिवेशनापूर्वी पावसाळी अधिवेशन?
महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होत आहे. 17 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू राहणार आहे. अशातच पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करुन खातेवाटप करण्याचा मानस शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा आहे. त्यामुळेच येत्या एक ते दोन दिवसांतच खातेवाटप जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणातील समीकरणांसोबतच शिंदे-फडणवीस सरकारचीही समीकरणं बदलली. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील मंत्रीपदाच्या चढाओढीमध्ये राष्ट्रवादीही वाटेकरी झाली. अशातच आधीपासूनच आशा ठेवून बसलेल्या शिंदेंच्या आमदारांवर पुन्हा नाराज होण्याची नामुष्की ओढवली आहे, तर भाजपच्या काही मंत्र्यांनाही आपली मंत्रीपदं सोडावी लागणार असल्याच्या चर्चा आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना नेमकी कोणती खाती द्यायची? याबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, राष्ट्रवादीकडे कोणती खाती जाणार? याबाबत दिल्लीतून वरिष्ठ निर्णय घेतील, अशी माहितीही सुत्रांकडून मिळत आहे.