शिंदे गटातील पाच मंत्र्यांवर टांगती तलवार ; गच्छंतीसाठी भाजपचा दबाव…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिंदे फडणवीस सत्ताधाऱ्यांमध्ये अलबेल असल्याचे समोर येत आहे. भाजप शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा आहे. असमाधानकारक कामगिरी आणि वादग्रस्त कार्यशैलीमुळे शिवसेनेच्या पाच मंत्र्यांबाबत भाजपचे वरिष्ठ नेते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, हा दावा भाजपने फेटाळून लावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. त्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. ही भेट मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होती, असे सांगण्यात आले असले तरी, भेटीत शहा यांनी या पाच मंत्र्यांच्या कार्यशैलीविषयी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड या पाच मंत्र्यांचा समावेश आहे. या पाचही मंत्र्यांची कार्यशैली वादग्रस्त मानली जाते.
पाच मंत्र्यांबाबत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात कमालीची नाराजी असून, त्यांच्या गच्छंतीची सूचना दिल्लीतील श्रेष्ठींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचे समजते. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता असून, लवकरच युतीमध्ये फुट पडणार असल्याच्या चर्चेने उधाण आलं आहे.