‘तुम्ही पळ काढू शकत नाही; पंतप्रधानांनी रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा’ ; राहुल गांधींची मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- ओडिशातील बालासोर येथे झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातावरुन विरोधी पक्ष मोदी सरकारवर टीका करत आहेत. अनेक विरोधी नेत्यांनी सरकारला यासाटी जबाबदार धरले आहे.
यातच आता काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विटद्वारे रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
“270 हून अधिक मृत्यू झाल्यानंतरही कोणी जबाबदारी घेतली नाही. मोदी सरकार अशा वेदनादायक अपघाताच्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. पंतप्रधानांनी तातडीने रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागावा,” असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
दरम्यान, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनीही केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्र्यांना घेरले. “भयानक रेल्वे अपघाताला 24 तासांहून अधिक काळ लोटला आहे. सर्वोच्च पदांवर बसलेल्या लोकांची जबाबदारी मानवतावादी आणि नैतिक आधारावर ठरवायला नको का? रेल्वेतील रिक्त पदे आणि महत्त्वाच्या क्षेत्रात निधीची कमतरता यासाठी कोणाला जबाबदार धरणार?लालबहादूर शास्त्री, नितीशकुमार, माधवराव सिंधिया यांच्याप्रमाणे रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको का ? ” असे प्रियंका म्हणाल्या.
काँग्रेसकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
याआधी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांच्या ‘प्रचार मोहिमे’मुळे रेल्वेच्या सुरक्षेशी तडजोड झाल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले, “‘नोव्हेंबर 1956 मध्ये अरियालूर ट्रेन दुर्घटनेनंतर लाल बहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता आणि ऑगस्ट 1999 मध्ये गॅसेल ट्रेन दुर्घटनेनंतर नितीश कुमार यांनीही तेच केले होते. आता पंतप्रधान मोदी, रेल्वेमंत्री वैष्णव यांचा राजीनामा घेणार का?”
अपघाताचे कारण काय?
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदल हे या रेल्वे अपघाताचे कारण असल्याचे मानले जात आहे. अपघाताचे कारण सिग्नलसाठी आवश्यक पॉइंट मशीन आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टमशी संबंधित असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. रेल्वे बोर्डाच्या सदस्य जया वर्मा सिन्हा यांनीही सिग्नलमध्ये अडचण आल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले आहे.
रेल्वेकडून 10लाख मदत
मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाखांची, गंभीर जखमींना 2 लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली. त्याशिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपापल्या राज्यातील पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.