“मी गेलो नाही याचं समाधान वाटतंय.”; पवारांची संसद उद्घाटन सोहळ्यावर जोरदार टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज, २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे.
आज संसदेत पार पडलेले कार्यक्रम पाहून मी तेथे गेलो नाही याचं आणखी समाधान वाटतंय अशा शब्दात पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पवारांनी या कार्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार म्हणाले की, सकाळी मी हा कार्यक्रम पाहिला. तो पाहिल्याच्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो नाही याचं आणखी मला समाधान वाटतंय. त्याचं कारण ज्या लोकांची तिथं उपस्थिती होती आणि जे काही कर्मकांड सुरू होतं ते पाहिल्यानंतर अधुनिक भारताची संकल्पना – जी जवाहारलाल नेहरूंनी मांडली, ती आणि सध्या संसदेत जे सुरू आहे त्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, असे पवार म्हणाले आहेत.
पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटत आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. नेहरूंनी अधुनिक विज्ञानावर आधारित समाज तयार करण्याची भूमिका सतत्याने मांडली. आज जे संसदेत चाललंय ते याच्या नेमकं उलट सुरू आहे असे शरद पवार म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, संसदेच्या कुठल्याही कामाची सुरूवात राष्ट्रपतींच्या उपस्थिती किंवा त्यांच्या भाषणातून होत असते. उद्या आधिवेशन सुरू झालं तर त्याची सुरूवात राष्ट्रपतींच्या भाषणाने होते. राज्यसभेचा मी सभासद आहे. राज्यसभेचे प्रमुख हे उपराष्ट्रपती आहेत. या कार्यक्रमात लोकसभेचे स्पीकर दिसले आनंद आहे, पण राज्यसभेचे स्पीकर जे उपराष्ट्रपती आहेत त्यांची उपस्थिती कार्यक्रमात दिसली नाही. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम फक्त मर्यादित घटकांपुरताच होता का अशी शंका वाटते असे शरद पवार म्हणाले.