शेतकऱ्यांसाठी खूप काही करायचं आहे, पुढचा टप्पा आपलाच, उद्धव ठाकरेंचा विश्वास…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जळगाव :- शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्याचा मानस असून सध्याच्या घडीला शेतकऱ्याचे मरण सुरु आहे, जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना अद्यापही काहीच मदत मिळालेली नाही. मात्र शेतकऱ्यांसाठी मला खूप काही करायचे आहे. आगामी काळात पुन्हा एकदा पिकेल ते विकेल हा उपक्रम राबवू, आता जाऊ द्या पण पुढचा टप्पा आपलाच आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी व्यक्त केला आहे.
आज उद्धव ठाकरे यांची सभा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) शहरात होत आहे. येथील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryvanshi) यांनी ही सभा आयोजित केली आहे. शिवाय येथील दिवंगत आमदार आर ओ पाटील (R O Patil) यांच्या अकरा फूट पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे हे बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या समवेत संजय राऊत, अरविंद सावंत, आंबदास दानवे उपस्थित आहेत. तर यावेळी ठाकरे यांनी निर्मल सिड्स (Nirmal Seeds) कंपनीत अनावरण कार्यक्रम पार पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांशी उद्धव ठाकरेयांनी चर्चा केली. यानंतर ते निर्मल सिड्स रेस्ट हाऊसला गेले असून थोड्याच वेळात सभेला सुरवात होणार आहे.
दरम्यान माजी आमदार दिवंगत आर ओ पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले कि, एका सभेसाठी आलो असताना आर ओ पाटील यांच्याकडे जेवायला आलो होतो. 2001 साली तेव्हा त्यांनी वैशालीबाबत सांगितले होते. दरम्यान आज ज्या पद्धतीने सरकार स्थापन झाले आहे. हे शेतकरी आणि कृषी विरोधक सरकार असून खुर्ची आली की शेतकऱ्यांना विसरतात. मात्र आपल्या सरकारने हे मोडीत काढले होते. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झालो होतो. कर्जमाफी बाबत बोललो होतो. त्यानुसार पीक कर्ज 2 लाखपर्यंत कर्जमुक्तीची घोषणा नागपुरात केली होती. शिवाय कोरोनात आर्थिक संकट असतानाही कर्जमुक्ती केली होती, असेही ठाकरे म्हणाले..
ते पुढे म्हणाले की, आपण कोरोना काळातही कर्जमुक्ती केली होती, मात्र आज शेतकऱ्याचे एवढे नुकसान होऊनही सरकारची काहीच हालचाल नाही, जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन घेतले जाते. मात्र इथे कापसाबाबत अजून खरेदी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. केंद्र सरकारने 51 हजार टन आयात केला आणि आयात शुल्क रद्द केले. काय मिळाले शेतकऱ्याला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. माजी आमदार आर ओ पाटलांची उणीव नक्कीच जाणवते, तात्या हे आपल्यातून गेलेच नाही आहे, आठवणी कायम आहेत. शेतकऱ्यांसाठी मला खूप काही करायचे आहे. पण आता जाऊद्या पण पुढचा टप्पा आपलाच असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.