उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार..? कथित १९ बंगल्याप्रकरणी पहिली अटक…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात सत्तासंघर्षावरून राजकारण तापलेले असतानाच १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील कोर्लईतील कथित १९ बंगल्याप्रकरणी पहिली अटक करण्यात आली आहे.
कोर्लई गावचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे. कथित १९ बंगल्याप्रकरणी फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायती अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यामध्ये सरकारी रेकॉर्डमध्ये खाडोखोड करुन फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास यंत्रणांनी गावचे सरपंच आणि संबंधित काही लोकांच्या कागदपत्रांची तपासणी केली होती. यानंतर आता पहिली अटक करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्याप्रकरणी ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन ग्रामसेवक, कोर्लई गावचे माजी चार सरपंच, अशा सात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१९ बंगल्याचे कनेक्शन ठाकरे कुटुंबाशी आहे, असे कथित आरोप होते. मात्र एफआयआरमध्ये ठाकरे कुटुंबातील कुणाचेही रितसर नाव नाही आहे. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाचे नाव उद्धव ठाकरे परिवाराशी जोडले होते. मात्र या सात जणांपैकी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे. पुढील लोकांची देखील चौकशी सुरू आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बंगल्याशी उद्धव ठाकरेंशी संबंध असल्याचा आरोप केला होता. दरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या चौकशीतून काही माहिती समोर आली तर ठाकरे कुटुंबाकडून देखील माहिती घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातील. यामुळे उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या अडचणी वाढू शकतात.