मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, कृषीमंत्र्यांचा शब्द…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज बीड जिल्ह्यातील कोळवाडी, धनगर वाडी, पिंपरनई , लिंब गणेश येथे गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून धीर दिला.
झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करा तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी (Affected Farmers) पंचनामापासून वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्या, असे निर्देश सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Beed) राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर असतांना कृषीमंत्री सत्तार यांनी मात्र तातडीने नुकसानग्रस्त भागाचा दौरा सुरू केला.
राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, असे आवाहन देखील त्यांनी केले. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील.
जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्यामुळे नुकसान झालेल्या फळबाग, मिरची, कांदा, भाजीपाला आदी पिकांची पाहणी सत्तार यांनी आज केली. सोबतच पिंपरनई येथे वादळीवाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या घरांची पाहणी करून त्यांना धीर दिला.
यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, विभागीय कृषी सहसंचालक दिनकरराव जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, चंद्रकांत नवले यांच्यासह महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.