आधी बाप पळवत होते, आता मुलंही पळवायला लागले ; संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाई यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला.
ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याच सांगितलं जातंय. दरम्यान, संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा काही धक्का वगैरे नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भूषण देसाई शिंदे गटात का गेले याचं कारणही राऊत यांनी सांगितलं आहे. तसेच मिंधे गट पूर्वी बाप पळवत होता. आता मुलंही पळवायला लागला, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. शीतल म्हात्रे यांच्या व्हिडीओ प्रकरणीही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणात पुरुष आमदाराचं काही म्हणणं असेल ना? ते कुठे आहेत? असा सवाल राऊत यांनी केला.
काय म्हणाले संजय राऊत?
मिंधे गट (Eknath Shinde) कधी बाप पळवतात. आता मुलंही पळवायला लागले आहेत. बाप आणि मुलं पळवण्याची ही मेगा भरती सुरू आहे. पण ती कूचकामी ठरेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते दिल्ली पत्रकारांशी बोलत होते.
भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश का केला? याचं कारणही त्यांनी सांगितलं. सामंत लोणीवाले हे राज्यातील मंत्री आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी भूषण देसाईंवर आरोप केले होते. त्यांच्या चौकशीचे आदेशही दिले होते. त्याचं काय झालं? त्याचं उत्तर देणार की नाही? तुम्ही आधी यावर उत्तर द्या, मगच आम्ही उत्तर देऊ, असं राऊत म्हणाले.
‘तो व्हिडीओ खरा की खोटा आधी तपासा’
शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओ (Viral Video) प्रकरणी अनेक तरुणांना अटक केली जात आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. हा काद्याचा गैरवापर आहे. मी दिल्लीत असल्याने ते प्रकरण नेमंक काय आहे, हे मला माहिती नाही. पण जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी तपासलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांची काही तक्रार आहे का? हे तपासणं गरजेचं आहे. कारण सर्व प्रकरणात त्यांचीही बदनामी झाली आहे. बदनामी ही फक्त महिलांचीच होते, असं नाही. पण हे घडत असताना ते नेमके कुठं आहेत? ते शांत का आहेत?, असा प्रश्नही राऊत यांनी विचारला.