कसबा-चिंचवड परीक्षेत महाविकास आघाडी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होईल, संजय राऊतांचा विश्वास…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस आणि आमचे इतर मित्र पक्ष या तिघांची आणि इतरांची मिळून जी महाविकास आघाडी झालेली आहे.
पुण्यामध्ये (Pune Elections) त्याची परीक्षा असून या परीक्षेत महाविकास आघाडी नक्की उत्तीर्ण होईल आणि चांगल्या मार्काने पास होईल, असा विश्वास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत (Sanjay Raut News) हे नाशिक (NashiK) दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, कसबा (Kasba Bypoll) आणि चिंचवड निवडणुकीत (Chinchwad Bypoll) भाजपची वाताहत झालेली दिसेल. नागपूर (Nagpur) आणि अमरावती ज्या पद्धतीने विधान परिषदेत भाजपचा पराभव झाला. त्याच पद्धतीने कसबा आणि चिंचवड निवडणुकीत होणार आहे. असच काहीस चित्र विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दिसून येणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आमचे इतर मित्र पक्ष या तिघांची आणि इतरांची मिळून जी महाविकास आघाडी झालेली आहे. पुण्यामध्ये त्याची परीक्षा असून या परीक्षेत महाविकास आघाडी नक्की उत्तीर्ण होईल चांगल्या मार्काने पास होईल, असा विश्वास आहे.
ते पुढे म्हणाले की, अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये (Andheri Bypoll) तुम्ही पाहिलं असेल की, शिवसेनेचा मोठा विजय झाला. तिथे नोटाला (NOTA) भरपूर मतं मिळाली. अशी माहिती आहे की, लोकांच्या भावना आहेत. त्यानुसार या दोन्ही निवडणुकांमध्ये नोटांचे प्रमाण वाढू शकतं, भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कायम मतदारांना गृहीत धरलं. पण आता वेळ निघून गेलेली आहे. महाराष्ट्राच्या मतदारांना कालपर्यंत तुम्हीही गृहीत धरलं, पण आता ते शक्य नाही. कारण सातत्यानं भाजपला जे झटके मिळत आहेत, ते पाहिल्यावर लक्षात येईल की, मध्यमवर्गीय, सामान्य माणूस, शिक्षक, पदवीधर मतदार हा भारतीय जनता पक्षावर नाराज आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला संपवण्यासाठी जे कट कारस्थान रचले जात आहे. त्याविरुद्ध महाराष्ट्रातील जनता असून ती नक्कीच यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.
टेबलाखालून जे चालायचं, ते आता टेबलावरून…
मनसेने पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा देणे यात नवीन काय? त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला काय आणि नाही दिला काय, सारखाच आहे. टेबलाखालून जे चालायचं ते आता टेबलावरून होतंय एवढंच, असा टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, सध्या आदित्य ठाकरे यांनी चिंचवडमध्ये दौरा केला आहे. पुढच्या काही दिवसांत आम्ही देखील जाऊ, ज्यावेळी प्रचाराला जेव्हा गती मिळेल, तेव्हा माझ्यासह अनेक नेते उपस्थित राहतील. सद्यस्थितीत भाजप पक्षामध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत. मला त्यांच्या पक्षात किती नाराजी आहे किंवा वाद आहे. यात पडायचं नाही. पण भाजप पक्षाबद्दल मतदारांमध्ये कमालीचा संताप आहे. शिवसेनेविषयी प्रेम आणि सहानुभूती आहे. या सगळ्याचा परिणाम कसबा आणि चिंचवड या निवडणुकीमध्ये दिसून येईल.