धक्कादायक..! जिल्हा परिषदेच्या शाळेत आसाराम बापूच्या प्रचाराचे धडे ; शिक्षण विभागात खळबळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारा प्रकार समोर आला आहे.
कारण नांदेडच्या भोकर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेत (Zilla Parishad Schools) अभ्यासक्रम बाजूला सारून शाळेतील गुरुजींकडून बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापूच्या (Asaram Bapu) कार्य कृतत्वाचे धडे आणि मंत्रोच्चार शिकवण्यात येत असल्याची असंवैधानीक बाब नुकतीच समोर आलीय. त्यामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून, कारवाईची मागणी केली जात आहे. तर भोकर तालुक्यातील नागापूर, डोर, सायाळ, रेणापूर, नांदा, सोनारी, हासापूर, रायखोड या बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळेत आसाराम बापूच्या कृतत्वाचे धडे दिले जात असल्याचे समोर आले आहे.
भोकर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुरुजींनी शासकीय शाळेत क्रमिक अभ्यासक्रमाच्या नव्हे, तर धार्मिकतेच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपी आसाराम बापूंच्या नावाने, चक्क मंत्रोच्चारासह कथित संस्काराचे पाठ घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. हा सर्व प्रकार समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे, तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये आसाराम आरोपी बापूंचे कार्यक्रम घेतल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत मंत्रोच्चाराचे कार्यक्रम
आधुनिक जगात लोक मंगळावर वसाहत निर्माण करण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यास अनुसरून काही गुरुजी भारतीय शिक्षणात क्रांती घडवण्यासाठी ज्ञानाचा आणि अध्यापन कौशल्यांचा उपयोग करत आहेत. तर शाळकरी मुलं देखील नव्या तंत्रज्ञानाच्या जगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याउलट भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील गुरुजी मात्र पुढील पिढ्यांच्या मनावर ज्ञान विज्ञानाच्या नव्हे, तर संस्काराच्या गोंडस नावाखाली चक्क आसाराम बापूचे धडे देत आहे. आसारामच्या भक्तमंडळीच्या नादी लागून जिल्हा परिषदेच्या शाळेत मंत्रोच्चारासह महिलांचे हळदी कुंकवाचे भलतेच कार्यक्रम करीत असल्याचे समोर आले आहे.
बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा
आपल्याच शिष्याच्या बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला (Asaram Bapu) गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एकीकडे त्याला बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली असताना, दुसरीकडे शाळेत आसाराम बापू यांच्या कथित विचारांचे पाठ विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर गिरवले जात आहेत. या गंभीर प्रकाराची दखल वरिष्ठांनी घेऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तर या सर्व घटनेने पालकांमध्ये मोठ्याप्रमाणावर संताप पाहायला मिळत आहे.