अरबी समुद्रातील शिवस्मारकावरुन संभाजी भिडेंची तिखट प्रतिक्रिया ; म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- अरबी समुद्रात होऊ घातलेल्या शिवस्मारकाबद्दल संभाजी भिडे यांनी आज कडक प्रतिक्रिया दिली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन समुद्रामध्ये स्मारक करण्याचा बेशरमपणा करु नये, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.
जुन्नर येथे आयोजित गडकोट मोहिमेच्या सांगता समारंभावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे बोलत होते. भिडे म्हणाले की, आपल्याकडे आधीच खूप पुतळे आहेत. त्यात आणखी अरबी समुद्रात महाराजांचा पुतळा उभा करु बेशरमपणा करु नये.
‘राज्यात सरकारं उलथी-पालथी होत आहेत. तो त्यांचा धंदा असला तरी दोन्हीही आपलेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपण पुढे जात राहिलं पाहिजे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं फक्त सोहळे करुन चालणार नाही. तर त्यांना होकायंत्र समजून चाललं पाहिजे’ असं संभाजी भिडे म्हणाले.
मागील अनेक वर्षांपासून अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासह शिवस्मारकाच्या प्रकल्पावर काम सुरु आहे. या प्रकल्पासाठी अद्यापही निविदा निघालेली नाही. मात्र या स्मारकाची गरज काय? अशी भूमिका संभाजी भिडे यांनी मांडली आहे.