काँग्रेसकडून २०२४ च्या निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- ‘भारत जोडो यात्रा’ सुरु झाल्यापासून एक प्रकारे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्याच्या चर्चा घडत आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात भारत जोडो यात्रेला यश मिळताना दिसत आहे.
त्यांच्या यात्रेने जवळ जवळ संपूर्ण भारत कव्हर केला आहे. दिल्लीनंतर ही यात्रा जानेवारीमध्ये पंजाबमध्ये दाखल होणार आहे. यात्रेने जवळपास १०० हून अधिक दिवसपूर्ण केले आहेत. या यात्रेनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या चर्चासुद्धा छेडल्या जात आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल हे जाहीर केले आहे.
पुढील लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वत: केली. शुक्रवारी (दि.३०) पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कमलाना यांनी सांगितले की, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राहुल गांधी केवळ विरोधकांचा चेहराच नसतील तर विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचे उमेदवारही असतील.
राहुल गांधी सत्तेसाठी राजकारण करत नाही
यावेळी बोलताना कमलनाथ म्हणाले, जगाच्या इतिहासात राहुल गांधींइतकी प्रदीर्घ पदयात्रा कोणीही केलेली नाही. गांधी घराण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कुटुंबाने देशासाठी इतके बलिदान दिलेले नाही. राहुल गांधी सत्तेसाठी राजकारण करत नाहीत, तर ते देशातील त्या जनते विषयी बोलतात जे सत्तेवर येण्यासाठी लोकांना निवडून देतात.
सिंधिया काँग्रेसमध्ये परतणार का ?
सिंधिया यांच्याबद्दल कमलनाथ यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी कोणत्याही व्यक्तीवर भाष्य करणार नाही, पण जे देशद्रोही आहेत. ज्यांनी पक्षाची फसवणूक केली आहे आणि ज्यांनी कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला आहे अशा लोकांना संघटनेत स्थान नाही, त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे कायमचे बंद आहेत.
भाजप मुख्यमंत्री बदलू शकतो
मध्य प्रदेशबाबत कमलनाथ यांनी दावा केला की, ज्या दिवशी राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार येईल, तेव्हा जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल. ते म्हणाले की, भाजप आपला मुख्यमंत्री बदलू शकतो, ही भाजपची अंतर्गत बाब आहे. गेल्या वेळी जनतेने काँग्रेसला निवडून दिले होते. आता भाजपने मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलला तरी काही फरक पडणार नाही, कारण राज्यातील जनतेने पुन्हा काँग्रेसच्या हाती सत्ता सोपवण्याचे मन बनवले आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस संघटनेत नक्कीच बदल करेल. मध्य प्रदेशात काँग्रेस प्रचंड बहुमताने सत्तेवर येणार आहे.