शिवसैनिकांतर्फे 9 जानेवारीला शेतकर्यांच्या विविध मागण्या साठी भव्य मोर्चाचे आयोजन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लम्पी आजाराने जनावरे दगावली आहेत. यावर पाहिजे तसे काम प्रशासनाकडून होत नाही.
पालकमंत्री संजय राठोड यांचेसुद्धा लक्ष नाही. पालकमंत्री व प्रशासनाने हा जिल्हा वार्यावरच सोडला आहे. त्यामुळेच येत्या 9 जानेवारीला शेतकर्यांच्या विविध मागण्या घेऊन भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री संजय देशमुख यांनी दिली. याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, विश्वास नांदेकर, प्रवीण शिंदे, माजी आमदार श्रीकांत मुनगिनवार, सागर पुरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना संजय देशमुख म्हणाले, होऊ घातलेल्या मोर्चात विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे व खासदार अरविंद सावंत उपस्थित राहणार आहेत. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असून, यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ 2017 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 1 लक्ष 28 हजार 464 शेतकर्यांना मिळालेला नाही. 389 कोटी 65 लक्ष रुपयांचा लाभ शेतकर्यांना त्वरित देण्यात यावा.
पीककर्जाचा नियमित भरणा करणार्यांसाठी शासनाने प्रत्येकी 50 हजार रुपये अनुदान देण्याची योजना केली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील 50 टक्के शेतकर्यांना मिळाला. उर्वरित शेतकर्यांना हे अनुदान देण्यात यावे. महावितरणने 2018 पासून कृषीपंपाची वीज जोडणी बंद केली आहे. जिल्ह्यातील 9500 शेतकर्यांनी डिमांड रक्कम भरलेली आहे. या सर्व शेतकर्यांना तातडीने कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्यात यावी. पीक विमा शेतकरी आशेने काढतात. या शेतकर्यांना पुरेसा लाभ मिळत नाही. अनेक ठिकाणी लाभात तफावत आहे. हा लाभ झालेल्या नुकसानाच्या प्रमाणात मिळावा. कापूस व सोयाबीन यवतमाळ जिल्ह्यातील मु’य पिके असून सद्यस्थितीत त्यांचे भाव पडल्यामुळे राज्य शासनाने कापूस 10 हजार आणि सोयाबीन 7 हजार क्विंटल भावाने खरेदी सुरू करावी या मागण्या करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.