कृषी मंत्रालयातून 15 कोटी वसुलीचे टार्गेट ; सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- कृषी मंत्रालयाकडून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना १५ कोटी रूपयांचे टार्गेट दिले असल्याची माहिती समोर आल्यानंतर विरोधीपक्षांनी विधानसभेमध्ये हे प्रकरण उचलून धरत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात होणाऱ्या महोत्सवासाठी कृषी आयुक्तांनी राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना या महोत्सवासाठी १५ कोटीचे टार्गेट दिल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, “सिल्लोड महोत्सवासाठी आयोजकांनी वेगवेगळ्या रक्कमेचे कूपन काढले आहेत. ते कूपन विकण्याचे किंवा खपवण्याचे काम राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आलं आहे. १० पेक्षा जास्त तालुके असणाऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना वेगळे आणि १० पेक्षा कमी तालुके असणाऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना वेगळे टार्गेट देण्यात आलंय.
कूपनमध्येही वेगवेगळ्या कॅटॅगरी आहेत. कृषी दुकानांकडूनही काही बेकायदेशीर रक्कमेची मागणी होत आहे. हे लोकशाहीला धक्का देणारं कृत्य आहे. हे सगळ्या नियमांची पायमल्ली करत असतात. त्यामुळे आम्ही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत” असं विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत
काय आहे नेमकं प्रकरण
१ ते १० जानेवारी दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे सिल्लोड महोत्सवाचे आयोजन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. त्यांच्या या कार्यक्रमासाठी कृषी आयुक्तांनी राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती एका कृषी संचालकाने दिली आहे. तर या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेले कूपन विकण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर आल्यामुळे अनेक अधिकारी तणावाखाली आले आहेत.
कसं आहे टार्गेट
आपापल्या विभागातून या महोत्सवात स्टॉल लावणारे वेगवेगळ्या रक्कमेच्या प्रवेशिका आणण्याचे टार्गेट या अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामध्ये २५ हजार, १५ हजार, १० हजार आणि ७ हजार ५०० अशा रकमेच्या प्रवेशिकांचा सामावेश आहे.