राष्ट्रवादीच्याच दोन नेत्यांमुळे अजितदादांवर नामुष्की, दोन दिवसांत दोनदा मागावी लागली माफी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे जयंत पाटील यांचं या अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आलं आहे.
विरोधकांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत जयंत पाटील यांनी अध्यक्ष महोदय असा निर्लज्जपणा करू नका, असं विधान केलं. जयंत पाटलांच्या या विधानानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. तसंच जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात बैठक झाली.
या बैठकीत जयंत पाटील यांचं वक्तव्य तपासण्यात आलं आणि मग त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी माफी मागितली. तसंच असं वक्तव्य कुणीही करू नये, असं स्पष्ट मत अजित पवारांनी मांडलं. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
या अधिवेशनात अजित पवार यांना दोन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा माफी मागावी लागली आहे.
भुजबळांमुळेही दादांची दिलगिरी कालच छगन भुजबळ यांनी मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी असल्याचा उल्लेख विधानसभेत केला. छगन भुजबळांच्या या विधानावर भाजपचे आमदार आक्रमक झाले. यानंतर भाजप आमदार मनिषा चौधरी भुजबळांचा विरोध करू लागल्या, तेव्हा भुजबळ त्यांना ए बस खाली असं म्हणाल्याचा आरोप भाजप आमदार योगेश सागर यांनी केला.
तसंच छगन भुजबळ यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप आमदारांनी केली. भुजबळांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. ‘मुंबई सर्वांची आहे, मुंबईबाबत कुणीही असं वक्तव्य करू शकत नाही. महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, अशी आमची भूमिका आहे. पण काहींच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,’ असं अजित पवार म्हणाले…..