भाजपा-मनसे युतीवर होणार शिक्कामोर्तब..? ; अमित शाहांची महत्त्वाची बैठक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांच्या मुंबई दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमित शाह यांनी मुंबईतल्या गणपतीचं दर्शन घेतलं. शाह यांनी कुटुंबियांसह लालबागचा राजा, वांद्रे येथील आशिष शेलारांच्या गणेशाचं दर्शन घेतले. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गणेश दर्शनासाठी गेले.
अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. गणपती दर्शनानंतर मुंबई भाजपा पदाधिकारी आणि भाजपा कोअर कमिटीसोबत अमित शाह बैठक घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यात या बैठकीच्या निमित्तानं मुंबईतील रणनीतीवर अमित शाह पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
भाजपा-मनसे युतीवर शिक्कामोर्तब?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपा-मनसे युतीची चर्चा सुरू आहे. अमित शाह यांच्यासोबत आज भाजपा नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी रणनीती बनवली जाण्याची शक्यता आहे. त्यात प्रामुख्याने मनसेसोबत युती झाल्यास काय फायदा आणि काय तोटा होऊ शकतो यावर चर्चा होईल. उद्धव ठाकरेंसोबत दुरावा आल्यानंतर भाजपानं राज ठाकरेंना जवळ करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत मराठी मतदारांना आपलसं करण्यासाठी राज ठाकरेंची मनसे भाजपाला हवी आहे. मुंबईत राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. लाखोंच्या सभा राज ठाकरे सहज घेऊ शकतात. त्यामुळे राज ठाकरे यांना भाजपासोबत कसं सामावून घेता येईल यावर बैठकीत चर्चा होऊ शकते.
तर राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा गट भाजपासोबत आला आहे. परंतु ठाणे सोडलं तर शिंदे यांची ताकद मुंबईत कमी पडण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील आमदार शिंदे गटासोबत असले तरी सामान्य मतदार, कार्यकर्ते शिंदेंसोबत कितपत आलेत याबाबत भाजपाला साशंकता आहे. त्यामुळे राज ठाकरेंसारखा चेहरा भाजपासाठी फायदेशीर ठरू शकतो. यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपाला मुंबई महापालिकेवर सत्ता काबीज करायची आहे. मागील २५ वर्षापासून या महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. त्यात गेल्या निवडणुकीत अवघ्या काही मतांनी शिवसेनेचं संख्याबळ जास्त होते. त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी भाजपा रणनीती आखत आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून भाजपा ‘मिशन मुंबई’ घेऊन वाटचाल करत आहे.