शरद पवारांचं मौन पण संजय राऊतांसाठी राहुल गांधी नंतर आता प्रियंका गांधी ही मैदानात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 5 ऑगस्ट :- मुंबईतल्या पत्रा चाळ रिडेव्हलपमेंटमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपाखाली इडीने शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक केली आहे.
संजय राऊत यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे राष्ट्रवादीकडून संजय राऊतांच्या अटकेवर सावध प्रतिक्रिया येत असतानाच काँग्रेस (Congress) मात्र संजय राऊतांसाठी मैदानात उतरली आहे. संजय राऊत यांच्या अटकेवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्वीट करून भाजपवर निशाणा साधला आहे. ‘धमकी, छळ, कपट यातून सत्ता ताब्यात घेणं आणि लोकशाही चिरडणं हेच भाजपचं एकमेव लक्ष्य आहे.
संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला, कारण ते भाजपच्या छळ-कपटाच्या राजकारणाला घाबरले नाहीत आणि त्यांचा सामना त्यांनी केला. भीती आणि धमकी भित्र्यांची हत्यारं आहेत, सत्याच्या वारासमोर हे टिकणार नाहीत,’ असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.
दरम्यान संजय राऊत यांना अटक झाली तेव्हा राहुल गांधींनीही भाजपवर निशाणा साधला होता. ‘राजाचा संदेश साफ आहे.
जो माझ्याविरुद्ध बोलेल, त्याला त्रास झेलावा लागेल. सरकारी एजन्सीचा गैरवापर करून विरोधकांचा हौसला तोडण्याचं आणि सत्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण तानाशाहने ऐकावं, शेवटी सत्यच जिंकेल आणि अहंकार हरेल,’ असं राहुल गांधी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले होते.
संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर आज त्यांना पुन्हा इडीच्या कोर्टासमोर हजर करण्यात आलं. सुनावणीनंतर त्यांची इडीची कोठडी कोर्टाने 4 दिवसांनी वाढवून 8 ऑगस्टपर्यंत केली आहे.