खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; केल्या या ५ प्रमुख मागण्या…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.
औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर केल्याने त्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते. मात्र शिंदे यांनी भेट दिल्याने जलील यांनी काळे झेंडे दाखवले नाही. याबाबत जलील यांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीत नामांतर, पाणीप्रश्न आणि शहरातील विविध योजनांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात खालील महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.
१. फक्त महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष व राजकीय व्देषापोटी विशेष म्हणजे औरंगाबादकरांना विकासाच्या मुख्य मुद्दयावरुन भटकविण्यासाठी शहराचे नामकरण करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आम्हाला खुप अभिमान व आदर आहे, फक्त राजकारणासाठी त्यांच्या नावाचा वापर करणे हि बाब दुर्भाग्यपूर्ण व निंदनिय आहे. आपणास नम्र विनंती की, सर्वसामान्य नागरीकांचे भावना लक्षात घेता जनमत आधारे मतदान घेवुन नामांतरणाचा निर्णय घेण्यात यावा.
२. मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधार ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) खाजगीकरण करण्याचे जनविरोधातील निर्णय घेण्याचे काम शासनस्तरावर सुरु असल्याचे समजते. सबब निर्णय हा गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याची चेष्टा करणारा असुन त्यास आमचा प्रखरतेने विरोध असुन सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील निर्णय घेणे आपल्या सरकारला अशोभणीय आहे. घाटी खाजगीकरण प्रस्ताव व निर्णयास त्वरीत स्थगती देण्यात यावी.
३. एकाच आठवड्यात गंगापूर तालुक्यातील अंबळनेर येथील दहा वर्षीय मुलगा आणि वैजापूर तालुक्यातील घोडेगाव येथील महाविद्यालयीन तरुणाला चिखलमय व खराब रस्त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यास उशिर झाल्याने दोन्ही जणांना वेळेवर प्राथमिक उपचार सुध्दा न मिळाल्याने दोघांना आपले जीव गमवावा लागला. आता अजुन किती जणांना चिखलमय व खराब रस्त्यांमुळे आपला जीव गमवावा लागेल? आपणास नम्र विनंती की, औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी त्वरीत विशेष पॅकेजची घोषणा करुन प्रथम प्राधान्याने रस्त्यांचे कामे सुरु करण्याचे आदेश निर्गमित करावे.
४. औरंगाबाद शहरामध्ये आमखास मैदानावर एक सुसज्ज भव्य स्टेडियम तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या क्रिडा विभागाकडून निधी उपलब्ध असुन सुध्दा आज तगायत स्टेडिमयम निर्माण करण्याचे काम प्रलंबितच आहे. सैन्यदल, पोलीस विभाग व इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी बजावणारे सर्व जवान, अधिकारी व खेळाडू हे याच मैदानावर सराव केलेले आहे. आमखास मैदानाच्या जागेचे विविध तीन शासकीय विभाग / संस्थानी अधिकार अभिलेख पत्रक (पीआर कार्ड) मध्ये त्यांच्या नावाची नोंद केलेली आहे. आपणास नम्र विनंती की, गरीब होतकरु व गुणवंत खेळाडूचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन आमखास मैदानावर सुसज्ज भव्य स्टेडियम तयार होणेस्तव त्वरीत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश निर्गमित करावे.
५. औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे आतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी बांधवांवर नियोजन शुन्य प्रशासकीय कारभार, तरतुदी व सुविधेंमुळे अधिकचे संकट ओढावले आहे. शेतकरी बांधवांचे झालेल्या आर्थिक नुकसानीची त्वरीत स्थळपाहणी व पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याचे आदेश निर्गमित करावे.