सरकारचा १०० दिवसांचा विशेष उपक्रम ; पालिका निवडणुकांत यश मिळवण्यासाठी प्रयत्न….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिंदे-फडणवीस सरकारने आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये जनमानसाचा कौल जिंकण्यासाठी शंभरनंबरी संकल्पाची तयारी सुरू केली आहे.
त्यानुसार समाजातील सर्व घटकांना खूश करतानाच राज्याचे विकासचक्र अधिक गतीमान करण्यासाठी खास १०० दिवसांचा विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
सरकार स्थिरस्थावर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी आता आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या निवडणुका आता इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणासह होणार असल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे. शिंदे यांच्या सरकारची खरी कसोटी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये लागणार आहे. त्यासाठी या निवडणुकांपूर्वी विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये सरकारविषयी आपलेपणाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जनमताचा कौल आपल्याकडे वळविण्यासाठी १०० दिवसांच्या ठोस कार्यक्रमांची आखणी सरकार दरबारी सुरू झाली आहे.
नव्या सरकारतर्फे येत्या १०० दिवसांत लोकोपयोगी योजना आणि उपक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागांकडून १०० दिवसात राबविता येतील अशा योजना आणि उपक्रमांचा तपशील मागविला आहे. त्यानुसार सर्व विभागाच्या सचिवांनी आपल्या विभागाच्या माध्यमातून कोणत्या लोकोपयोगी योजना राबविता येतील याचा आराखडा मुख्य सचिवांना सादर केला आहे.
यामध्ये प्रामुख्याने महापालिका-जिल्हा परिषद निवडणुका डोळय़ासमोर ठेवून अमृत२.० अभियान, स्वच्छ भारत अभियान, सर्व शहरांमध्ये मानवी पद्धतीने केली जाणारी भुयारी गटारांची सफाई बंद करून केवळ यांत्रिकी पद्धतीनेच सफाई करणे, सर्व महापालिकांमध्ये अनधिकृत बांधकामांना वापर परवाना देण्यासाठी अभय योजना राबविणे अशा महत्त्वाच्या योजना राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत नगरविकास, ग्रामविकास, कृषी, सहकार, शिक्षण, आरोग्य अशा प्रमुख विभागांकडून आलेल्या लोकहिताच्या आणि वेळेत अंमलबाजवणी योग्य प्रस्तावांचे एकत्रीकरण करून त्याच्या आधारे सरकार आपला शंभरनंबरी संकल्प लवकरच जाहीर करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
सामान्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री….
डोंबिवली: कष्टकरी, फेरीवाला अशा सामान्यातल्या सामान्य घटकांचे अनेक प्रश्न आहेत. या वर्गाचा विकास झाला पाहिजे, अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचना आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महाराष्ट्रात सामान्यांच्या विकासासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे कल्याण डोंबिवली पालिका आयोजित पंतप्रधान स्वनिधी विकास योजना कार्यक्रमात केली. दरम्यान, स्वावलंबी पथविक्रेता कार्यक्रमात फेरीवाल्यांची बाजू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि व्यासपीठावरील मान्यवरांनी ऐकून न घेतल्याने संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली.