दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस ; नागरिकांत पुराची भीती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर यवतमाळ जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. बहुतांश भागात रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने ग्रामीण भागात नागरिकांमध्ये पुराची धडकी भरली आहे.
आज (शनिवार) सकाळी साडेआठ वाजतापासून यवतमाळ शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
अनेक कुटुंब अद्यापही निवारागृहात –
गेल्या आठवड्यात रविवार ते मंगळवारपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे यवतमाळ, राळेगाव, वणी, कळंब, बाभूळगाव आदी तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. दोन दिवसांत जिल्ह्यातील ५६२ कुटुंबातील दोन हजार २४७ व्यक्तींना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. यातील अनेक कुटुंब अद्यापही निवारागृहात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरचित्रप्रणालीद्वारे जिल्ह्यातील पूरस्थिती व नुकसानीचा आढावा घेतला. पूरग्रस्त भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिली. गुरुवारपासून पावसाने थोडी उसंत घेतल्याने पूरग्रस्त भागातील पंचनामे व सर्वेक्षणाच्या कामास गती आली होती. जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बेंबळा, वर्धा, पैनगंगा, अडाण, अरूणावती या नदी काठांवरील ग्रामस्थांमध्ये धडकी भरली आहे. यावर्षी या सर्व नद्यांना जुलैमध्ये पूर आल्याने प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यात सर्व लहान धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत तर बेंबळा, अधरपूस प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.