शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम ठरलं……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 7 जुलै :- राज्यात सत्ताबदल होऊन एकनाथ शिंदे सरकार अस्तित्वात आले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत.
भाजपा आणि शिंदे गटाच्या या सरकारमध्ये मंत्री कोण असणार? नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केंव्हा होणार? कोणत्या पक्षाला किती खाती मिळणार? याची उत्सुकता अजूनही कायम आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षातील काही ज्येष्ठ नेते मंत्रीपदाची शपथ घेतील. तर उर्वरित विस्तार हा राष्ट्रपती निवडणुकीच्या नंतर केला जाईल. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीची निवडणूक होणार असून 22 जुलै रोजी देशाचा नवा राष्ट्रपती निश्चित होईल.
या निवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षांतर्फे यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोणत्या पक्षाला कोणती खाती? नव्या सरकारमध्ये गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती भाजपाकडे तर नगरविकास आणि महसूल ही खाती शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. अर्थ खातं सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दादा भुसेंकडे पूर्वीचेच कृषी तर उदय सामंत यांना शिक्षण विभाग देण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दीपक केसरकर यांनाही चांगलं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना शिंदे सरकारमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत शंभुराज देसाई आणि अब्दुल सत्तार या राज्यमंत्र्यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते.
शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका, 13,340 कोटींचा ‘तो’ निधी रोखला किती मोठे मंत्रिमंडळ असेल ? 91व्या घटनादुरुस्तीमध्ये कलम 72 मध्ये 1A च्या नावाने एक नवीन कलम जोडण्यात आले, ज्यामध्ये मंत्रिमंडळाचा आकार आणि प्रकार स्पष्ट शब्दात स्पष्ट करण्यात आला आहे. तो केंद्रीय मंत्रिमंडळासाठी 72(1A) सुधारणा कायदा आहे तर राज्यांसाठी कलम 164(1) मध्ये स्पष्ट केला आहे. आता याच आधारावर राज्याचे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या ठरवायची आहे.
महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 असल्याने त्यातील 15 टक्के म्हणजे 42. म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनते तेव्हा त्यात जास्तीत जास्त 42 जणांनाच मंत्री करता येते. यामध्ये मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. 28 नोव्हेंबर 2019 रोजी ठाकरे सरकारने शपथ घेतली तेव्हा त्यांच्यासोबत 31 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्री होते.