महाराष्ट्राच्या विकासासाठी फडणवीसांनी केले त्याग ; नवनीत राणा यांच्याकडून फडणवीसांच कौतुक……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होऊन 24 तास होत आले तरी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ का घेतली असेल असा सवाल अजूनही कायम आहे.
याबाबत तर्क-वितर्क मांडले जात असतानाच मात्र, नवनीत राणा यांनी त्यामागची कारणे सांगितली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आशा बाळगली नाहीतर राज्याच्या विकासासाठी त्यांनी हा त्याग केला आहे. पदापेक्षा सर्वसामान्य जनतेचा विकास हाच त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली असल्याचे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले. गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राणा दाम्पत्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. एवढेच नाहीतर बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने खऱ्या अर्थाने भाजपा पूर्ण करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचा विकास हे व्हिजन..!
सर्वकाही सहज शक्य असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री नाहीतर उपमुख्यमंत्री पद घेतले. सत्तेसाठी सर्वकाही हे भाजपाचे धोरणच नाहीतर राज्याचा विकास हेच व्हिजन असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. राजकारणापेक्षा समाजकारण करायचे आहे. त्यामुळे ते आता सदैव जनतेच्या मनात राहतील. जनतेची कामे करता यावीत म्हणूनच त्यांनी पदाची अपेक्षा केली नसल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. मात्र, देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयानंतर सबंध महाराष्ट्राच्या मनात पदाला घेऊन प्रश्न हा कायम आहेच. पण त्यामागची कारणे ही राणा यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.
भाजपाकडूनच बाळासाहेबांचे स्वप्न साकार
बाळासाहेब ठाकरे हे सर्वसामान्य शिवसैनिकाला महत्व देत होते. शिवाय मुख्यमंत्री पदी शिवसैनिक विराजमान झाला तर त्यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मित्रपक्ष राहिलेला भाजपच बाळासाहेबांचे स्वप्न साकार करीत असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.