मोठी बातमी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदावरुन व विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा ; महाराष्ट्रात सत्ताबदल अटळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रातील राजकारणात घडामोडींनी वेग धरला आहे. विधानपरिषदेची निवडणूक संपली आणि राजकीय नेत्यांचे रस्ते रातोरात बदलले. शिवसेनेत मोठी फूट पडली आणि आता पर्यायाने सरकार पडणार, हे स्पष्ट झालंय.
यादरम्यान महाविकास आघाडीतही बैठकींचं सत्र सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावली असून सर्व मंत्री उपस्थित होते. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी मंत्रीमंडळाची ही शेवटची कॅबिनेट ठरली. आजच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे यांनी महाराष्ट्राला संबोधन करत मोठा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याचं त्यांनी म्हटलं.
मागील दोन दिवसांपासून घडामोडी वायूवेगाने पुढे सरकल्या. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात हालचाली होऊ लागल्या. प्रकृती स्थिर होताच यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली. यानंतर महाविकास आघाडी सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच आकड्यांचं समीकरण साधता न आल्याने शिवसेनेला सत्ता सोडावी लागणार असल्याचं निश्चित झालं आहे.
आजच्या कॅबिनेट बैठकीसाठी मंत्री जितेंद्र आव्हाड, नितीन राऊत,अस्लम शेख, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम, अशोक चव्हाण, अमित देशमुख, के.सी. पाडवी आणि सुनील केदार पोहोचले होते.
सर्वोच्च न्यायालयात दणका
राज्यपालांनी बहुमत चाचणी तत्काळ घेण्याचे निर्देश दिल्यानंतर शिवसेसेने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. राज्यपालांच्या निर्णयावर आक्षेप घेत सेनेच्या वतीने काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली. राज्यपालांची बाजू मांडणारे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता, बंडखोर आमदारांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल व शिवसेनेच्या मनु संघवी यांनी आपापली बाजू मांडली.
शिवसेनेची शेवटची अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने संपली आहे. साडेतीन तास युक्तीवाद झाला आणि यानंतर अखेर निर्णय समोर आला आहे. बहुमत चाचणी रोखण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे मविआ सरकारला उद्या अग्निपरिक्षेला सामोरं जावं लागणार असल्याचं स्पष्ट झालंय. याआधीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे…?
येवढे वर्षे आम्ही बोलत होतो पण आम्ही शेतकऱ्यांनी कर्जमुक्त केलं आहे.
स्वत: शिवसेनाप्रमुखांनी जे नाव ठेवलं ते नाव आपण संभाजीनगरला दिलं आहे.
पुढची वाटचाल सगळ्यांच्या आशिर्वादाने सुरू राहील. नामांतरावरून मला आनंद वाटला.
एखादी गोष्ट चांगली सुरू असली की त्याला दृष्ट लागते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवेसनेचे ४ मंत्री उपस्थित होते. ज्यांना मोठं केलं ते आज विसरले. शिवसेना काय आहे. ते अनुभवत आलोय.
साधी साधी माणसं आम्हाला प्रोत्साहन देत राहिली. ज्यांना दिलं ते नाराज आहेत, ज्यांना नाही दिलं ते खूष आहेत.
बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं आहे.
कोर्टाने निर्णय दिला आहे, आता न्यायालयाचा मान राखला पाहिजे, उद्या बहुमताला सामोरं जावं लागणार आहे, लोकशाहीचं पालन झालंच पाहिजे.
लोकशाहीचा मान राखल्याबद्दल राज्यपालांचे आभार मानतो
काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी पण बैठकीनंतर सांगितलं की तुम्ही नाराज होवू नका आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो.
केंद्राच्या सूचनेवरून मुंबईत सुरक्षा वाढवली जातेय. उद्या चीन सीमेवरील सुद्धा सुरक्षा मुंबई येईल याची लाज वाटते. एवढी लाज सोडली.
उद्या लोकशाही जन्माला येतीय. त्याचा पाळणा हलतोय.
उद्याच्या शिवसैनिकांना कुणीही आडवं येवू नये. तुम्हाला कोणीही अडवणार नाही.
उद्या शिवसेनाप्रमुखाच्या पोराला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचं पुण्य त्यांना लाभणार आहे. मला पद जाण्यातची खंत अजिबात नाही, बहुमतामध्ये मला रस नाही.
मी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे. तसेच विधानपरिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देत आहे.