राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक ; “या” 2 गोष्टीवर बैठकीत निर्णय होण्याची शक्यता….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलवण्यात आली आहे. दुपारी अडीच वाजता मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल.
ठाकरे सरकारची ही शेवटची कॅबिनेट ठरणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. बंडखोरीच्या पार्श्वभूमीवरती आजच्या कॅबिनेट बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर झालेली ही दुसरी कॅबिनेट बैठक आहे. कालच (सोमवार, 27 जून) कॅबिनेटमधील खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आले होते. त्यानंतर आज होणारी ही पहिलीच कॅबिनेट बैठक असणार आहे. या बैठकीमध्ये नेमके काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आजचा आठवा दिवस आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधून शिवसेनेनं बाहेर पडावं आणि भाजपसोबत युती करावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतच राहण्यावर ठाम असल्याची भूमिका पक्षप्रमुख या नात्यानं उद्धव ठाकरेंनी घेतलीय. आता दरम्यानच्या सर्व घडामोडींचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचलाय. सोमवारी झालेल्या सुनावणीनंतर आता याप्रकरणी 11 जुलै रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे.
कोणत्या 2 महत्त्वपूर्ण बाबींवर निर्णय होणार?
खातेबदल केल्यानं जुन्या निर्णयांचं काय होणार….?
खातेबदलानंतर बंडखोर आमदार आता बिनखात्याचे मंत्री राहिले आहेत. या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांबाबत महाविकास आघाडी सरकारकडून महत्त्वपूर्ण चर्चा केली जाऊ शकते. तसंच या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांबाबतही कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या बैठकीकडे बिनखात्याचे मंत्री राहिलेल्या बंडखोरांचं विशेष लक्ष असणार आहे.
जीआर आणि शासकीय निर्णयांचा धडाका : बंडखोर आमदारांच्या घडामोडी घडत असताना 250 जीआर आणि 280 सरकारी आदेश महाविकास आघाडी सरकारनं काढले. कोट्यवधी रुपयांचे आदेश जारी केल्यानंतर आता याविरोधात राज्यपालांकडे विरोधीपक्षानं दाद मागितली आहे. त्यानंतर आता आजच्या बैठकी पुन्हा जीआर आणि शासकीय आदेशांचा धडाका कायम ठेवला जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात आणि चर्चा होते, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
मंत्रिमंडळातील मोठे फेरबदल कोणते होते?
एकनाथ शिंदेंचं खात सुभाष देसाईंकडे (नगर विकास, सार्वजनिक बांधकाम)
दादा भुसे, संदिपान भुमरे याचं खातं शंकर गडाखांकडे (कृषि व माजी सैनिक कल्याण/रोजगार हमी, फलोत्पादन खाते)
उदय सामंत यांचं खाती आदित्य ठाकरेंकडे (उच्च व तंत्र शिक्षण खाते)
गुलाबराव पाटील यांचं खात अनिल परबांकडे (पाणी पुरवठा व स्वच्छता)