पंतप्रधान मोदीं समोर राज्यपालांनी केली मुख्यमंत्र्यांची तक्रार ; मांडले अनेक प्रश्न…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 14 जून :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यामधील वादाची पुन्हा एकदा झलक पाहण्यास मिळाली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राज्यपालांनी राज्यातील समस्यांचा पाढा वाचला. तसंच, औरंगाबादमधील पाणी समस्येचाही उल्लेख केला. राज्यपालांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘ जलभूषण ‘इमारतीचे उद्घाटन, द्वारपूजन पार पडले. त्यानंतर राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.
यावेळी बोलत असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. ‘विशेष करून सिंचन योजना आहे. अनेक सिंचन योजनावर काम झाले आहे. गेल्या 40 वर्षांपासून काम सुरू आहे.
पण, त्याचा काहीच उपयोग होत नाही. पैसे खर्च केला जात आहे. औरंगाबाद शहरात पाण्याची तीव्र टंचाई आहे. लोकांना 7 दिवसांपासून पाणी मिळत नाही.
त्यामुळे अरुण जेटली म्हणायचे मोदी है तो मुमकीन आहे. मी आता आठ वर्षांनंतर म्हणतो मोदी है तो मुमकीन आहे, पंतप्रधान मोदी यांनी या योजना पूर्ण कराव्यात, असंही राज्यपाल म्हणाले. ‘माझी इथं येण्याची इच्छा नव्हती. मी आता आराम करावा, मी आता म्हातारा झालो आहे, असं पंतप्रधानांना सांगितलं होतं.
पण, प्रेम आणि स्नेह असल्यामुळे पंतप्रधानांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी इथं आलो, असंही राज्यपाल म्हणाले. ‘मला लोक विचारतात महाराष्ट्र तुम्हाला कसा वाटतो, तर महाराष्ट्र हा मला हिमालयासारखा वाटतो. मी उत्तराखंडमध्ये जातो पण तिथे समुद्र नाही. इथं सगळं काही आहे पण हिमालय नाही. पण अत्यंत सुंदर प्रदेश आहे. महाराष्ट्रासारखा सुंदर प्रदेश नाही, असंही राज्यपाल म्हणाले.